Join us  

खिलाडी हिट है! सलमान-करणच्या सिनेमात अक्षय कुमार हिरो

By admin | Published: January 03, 2017 2:45 AM

2018 मध्ये येणाऱ्या खिलाडीच्या या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नाही. पण या चित्रपटाचे दिग्दर्शन पंजाबी चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शिक अनुराग सिंह करणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - दबंग सलमान खानने मतभेद बाजूला सारत अखेर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबत हातमिळवणी केली आहे. सल्लूमियाँ करण जोहरसोबत मिळून सिनेमाची निर्माती करणार आहे, ज्याचा हिरो दुसरा-तिसरा कुणी नसून बॉलिवूड नाही-नाही बॉक्सऑफिसचा खिलाडी अक्षय कुमार असणार आहे. तशी घोषणाच खुद्द सलमानने केली आहे. पंजाबी हिट सिनेमा सीरिज 'जट अँड ज्युलियट'चे दिग्दर्शक अनुराग सिंह या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती मिळते आहे.    
 
सलमानने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. यानंतर करण जोहर आणि अक्षय कुमारनेही ट्विट करत या बातमीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केला. मात्र या त्रिकुटाचा बॉक्सिऑफिसवरील जलवा पाहण्यासाठी तुम्हाला वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे.  
 
सलमान खानच्या सिनेमांचा प्रभाव 
गेल्या काही वर्षांपासून सलमान खान सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरला आहे. सलमान खान प्रोडक्शनचा पहिला सिनेमा होता 'चिल्लर पार्टी', या सिनेमाने सर्वांची मने जिंकत वाहवाई लुटली. रणबीर कपूरने या सिनेमामध्ये एक आयटम नंबरदेखील केले होते. त्यानंतर आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज आणि अथिया शेट्टी या दोघांना सलमानने 'हिरो' सिनेमातून लाँच केले. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगला आपटला मात्र सिनेमातील गाणी बरीच हिट ठरली. 
 
 
 
धर्मा प्रोडक्शन नंबर वन 
करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन बॉलिवूडमधील नंबर वनची प्रोडक्शन कंपनी बनली आहे. या कंपनीने स्टार फॉक्ससोबत 2015 मध्ये एकूण 9 सिनेमांचा करार केला होता. यानंतर धर्मा प्रोडक्शनकडे सिनेमांची मोठी रांगच लागली. 2016 मध्ये धर्मा प्रोडक्शनने 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाची निर्मिती केली, या सिनेमा 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.  तर या प्रोडक्शनचा आगामी सिनेमा 'ओके जानू' असून येत्या 13 जानेवारीला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमाद्वारे 'आशिकी 2' मधून हिट ठरलेली जोडी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
 
शाहरुखचा 'जिवश्च कंठश्च' मित्र करण जोहर
सलमान खानची करण जोहरसोबत कधी चांगली मैत्री जुळून आली नाही. याचे एकमेव कारण होते शाहरुख खान. करण आणि शाहरुखच्या मैत्रीमुळे सलमान करणपासून अंतर राखून होता. मात्र करणने बॉलिवूडमध्ये नंबर वनचा प्रोड्युसर म्हणून स्वतःची जागा निर्माण केली आहे.  बॉक्सऑफिसवर हिट ठरणारे सर्वाधिक सिनेमे त्याच्याच प्रोडक्शन हाऊसचे असतात. अशातच सलमानने करणसोबत हातमिळवणी करणे, व्यावसायिकदृष्ट्या एक चांगली बातमी असल्याचे म्हटले जात आहे.  शिवाय आता शाहरुख आणि सलमानचीही गट्टी जमली आहे.
 
अक्षय-सलमान जोडगोळी पुन्हा एकत्र 
डेविड धवन यांचा सिनेमा 'मुझसे शादी करोगी'मध्ये अक्षय कुमार आणि सलमान खान शेवटचे एकत्र दिसले होते. या सिनेमामध्ये अक्षय कुमार अभिनयाच्या जोरावर बाजी मारली होती. सलमान आणि अक्की बॉलिवूडमध्ये आता स्वतंत्र ब्रँड बनले आहेत. त्यातच आता बॉलिवूडचा नाही तर बॉक्सऑफिसचा खिलाडी म्हणून अक्षय कुमार प्रसिद्ध झाला आहे. अक्षय कुमारचा सिनेमा म्हटलं तर प्रेक्षक आपोआपच सिनेमागृहांकडे खेचले जातात. वर्षाला चार सिनेमा करणा-या अक्षयचे दोन सिनेम सुपरहिट तर दोन सिनेमांना सरासरी यश मिळतेच, हे गणित आता फिक्स्डच झालं आहे.  2016 प्रमाणे 2017 आणि 2018 हे दोनही वर्ष खिलाडीसाठी लकी ठरणार असल्याचे दिसत आहे. 2016 मध्ये अक्कीच्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. 
 
2017मध्ये अक्षय कुमारचे चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  जॉली एलएलबी 2,  टॉयलेट एक प्रेमकथा,  2.0 आणि पॅडमॅन, असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे रिलीज होणार आहेत. या सिनेमांच्या पोस्टर्सनी चाहत्यांची उत्सुकता ताणून धरली आहेच. पण, अक्षय, सलमान आणि करण जोहरचे फॅन्स या त्रिकुटाचा आगामी सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.