Join us  

भाऊ कदमला जेव्हा राग येतो, या कारणामुळे भाऊने चाहत्याला सेल्फी काढण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 3:33 PM

सेल्फीसाठी एक तरुण भाऊ कदमकडे आला. त्यावेळी तिथं गर्दीही झाली होती. तरुणाने भाऊकडेसेल्फीचा आग्रह धरला.

आपल्या आवडत्या कलाकारासह फोटो काढावा, सेल्फी काढावा किंवा ऑटोग्राफ मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्या क्षणासाठी रसिक काहीही करायला तयार असतात. त्यामुळे कलाकारांनाही आपली रसिकांमध्ये असलेली लोकप्रियता कळून येते. त्यामुळे कलाकार मंडळी यासाठी मोठ्या आनंदाने तयार होतात. मात्र कधी कधी अतिउत्साही चाहत्यांमुळे काही कलाकार यासाठी नकारही देतात. नुकताच असाच एक प्रकार विनोदवीर अभिनेता भाऊ कदम सोबतही घडला. आपला अभिनय आणि कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांची मनं भाऊ कदम यांनी जिंकली आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत सेल्फी, फोटो काढण्याची अनेकांची इच्छा असते. अशाच सेल्फीसाठी एक तरुण भाऊ कदमकडे आला. त्यावेळी तिथं गर्दीही झाली होती. तरुणाने भाऊकडेसेल्फीचा आग्रह धरला. 

त्यावेळी भाऊ कदम त्या तरुणावर अचानक भडकला कशाला हवाय सेल्फी ? काय करता त्या सेल्फीचं ? असे अनेक प्रश्न भाऊने त्या तरुणाला विचारले. त्यामुळे तरुण निराश अन् निरुत्तर होऊन पुन्हा जागेवर बसला. 'व्हिआयपी गाढव' या भाऊ कदमच्या चित्रपटाच्या मुंबईतील संगीत प्रकाशन सोहळ्यात हा प्रकार घडला. यावेळी बोलताना आपल्या संतापाचं कारण भाऊ कदमने स्पष्ट केलं. “चाहत्यांना भेटतो तेव्हा आमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी उसळते मग मराठी चित्रपटाच्या शोला ही गर्दी कुठे जाते? सेल्फी काढण्याचा आनंद चित्रपट पाहण्यात का बदलत नाही? ज्यादिवशी मराठी रसिक आपल्या मराठी चित्रपटांवर प्रेम करेल तेव्हाच मराठी चित्रपट मोठा होणार आहे” असं भाऊ कदमने यावेळी सांगितलं. व्हिआयपी गाढव हा संजय पाटील दिग्दर्शित भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विजय पाटकर, शीतल अहिरराव अभिनित चित्रपट येत्या १३ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. यांत भाऊ कदमने गंगारामची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहतांना दादा कोंडके यांचा काळ आठवणार आहे. 

टॅग्स :भाऊ कदम