Join us  

या कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 2:43 PM

मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि अहमदनगरपासून जवळ असलेल्या वैजापूर शहरात हा गोरख जोगदंडे दिग्दर्शित ‘रॉमकॉम’ हा प्रेमपट बहरतो आहे. नवोदित जोडी मधुरा वैद्य आणि विजय गीते यांच्यासह किशोर कदम, असीत रेड्डी, छाया कदम हे दिग्गज कलावंत असलेला हा चित्रपट त्याच्या वेगळ्या लोकेशनमुळे सध्या चर्चेत आहे.

‘मराठवाडा' महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठेवा आहे. अनेक राजांची राजवट, निजामशाही येथे नांदली. त्यामुळे येथील भारतीय संस्कृती,  धर्म,  अर्थ, कला आणि वाड्मयात विविधता आढळते. हा भूप्रदेश नानाविध कलांनी समृद्ध आहे. मराठवाड्याचे ऐतिहासिक सौंदर्य, संत, सत्पुरुष, मठ, मंदिर, घराणी, गुरुद्वारे, लेण्या, गडकोट, वाड्मय, संस्कृती अशी अनेक वैशिष्ट्य. मराठवाड्याच्या या समृद्ध परंपरेत दाखल होतो आहे एक नवा मराठी सिनेमा ‘रॉमकॉम.

मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि अहमदनगरपासून जवळ असलेल्या वैजापूर शहरात हा गोरख जोगदंडे दिग्दर्शित ‘रॉमकॉम’ हा प्रेमपट बहरतो आहे. नवोदित जोडी मधुरा वैद्य आणि विजय गीते यांच्यासह किशोर कदम, असीत रेड्डी, छाया कदम हे दिग्गज कलावंत असलेला हा चित्रपट त्याच्या वेगळ्या लोकेशनमुळे सध्या चर्चेत आहे. याबद्दल दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांनी सांगितले की, या चित्रपटाचे कथानक हे याच भागातले असल्यामुळे त्यांची बोलीभाषा आणि इतर सर्व गोष्टी या मराठवाड्यातील वैजापूरशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यामुळे निर्माते सचिन शिंदे यांनी हा चित्रपट याच भागात चित्रित करण्याचे ठरवले. संपूर्ण चित्रीकरणादरम्यान ते संपूर्ण वेळ उपस्थित होते.

नेहमीपेक्षा वेगळ्या भागात घडणाऱ्या या चित्रपटाबद्दल कलाकारही उत्सुक असून त्यांच्याही आजवरच्या भूमिकांपेक्षा हटके भूमिका चित्रपटात असल्याचे अभिनेता असित रेड्डीने सांगितले. प्रेमकथा, अॅक्शन आणि विनोद यांचा संगम असलेला प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून रॉमकॉम ओळखला जाईल असा ठाम विश्वास मधुरा आणि विजय या नवोदित जोडीला आहे. 30 दिवसांचे शुटींगचे सत्र हे स्थानिकांच्या अमुल्य सहकार्यामुळे पूर्ण होऊ शकले, त्यांच्या आदरातिथ्याने चित्रपटाची टीम भारावून गेल्याचे क्रिएटिव्ह हेड मृदुला वैभव आणि वेशभूषाकार शीतल पावसकर यांनी सांगितले. ‘रॉमकॉम’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल, असे निर्माते सचिन शिंदे यांनी सांगितले.

या चित्रपटाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली असल्याने हा मराठवाड्याच्या मातीतील चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.