Join us  

चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटना पाहता अंगरक्षकांच्या गराड्यातही भीती वाटते : सोनाली कुलकर्णी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 1:00 PM

कथुआ, उन्नाव यांसारख्या घटनांमुळे संपूर्ण देश हादरला असून, समाजातील विविध स्तरातून या घटनांचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. ...

कथुआ, उन्नाव यांसारख्या घटनांमुळे संपूर्ण देश हादरला असून, समाजातील विविध स्तरातून या घटनांचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. चित्रपट कलाकारांनीही या घटनांचा निषेध करताना आपल्या रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही आपले मत मांडले असून, अंगरक्षकांच्या गराड्यातही भीती वाटत असल्याचे सांगितले. सोनालीने म्हटले की, ‘सध्या आठ, दहा, बारा वर्षांच्या मुलींबाबत ज्या घटना समोर येत आहेत, त्या बघून अंगरक्षकांच्या गराड्यात राहूनही मला भीती वाटते.’सोनाली नाशिक येथे वसंत व्याख्यानमालेच्या प्रारंभाप्रसंगी बोलत होती. यावेळी सोनालीची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीदरम्यान, तिने देशातील महिलांच्या सुरक्षिततेवरून चिंता व्यक्त केली. सोनालीने म्हटले की, आम्ही नेहमीच अंगरक्षकांच्या गराड्यात असतो, अशातही माझ्या मनात भीती आहे. मग सामान्य मुलींचे काय होत असेल याची कल्पनाही करवत नाही. ज्या घटना समोर येत आहेत अन् त्यावर ज्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, ते ऐकून खूप त्रास होतो. आठ, दहा वर्षांच्या चिमुरड्यांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा खोलवर जाऊन विचार व्हायला हवा. पुढे बोलताना सोनालीने म्हटले की, ‘कुटुंबातील मोकळे वातावरण हरवत असल्याचीही चिंता वाटते. कारण मुलींना आपण नेहमीच सांगत असतो की, तिने कोणते कपडे घालावेत, लवकर घरी यावे, कसे वागावे, कोणती प्रतिक्रिया द्यावी? पण मुलांना आपण असे प्रश्न विचारतो काय? वास्तविक कुटुंबात अधिक मोकळे वातावरण असायला हवे. मुलांसोबत वेळोवेळी संवाद साधायला हवा. भारतीय कौटुंबिक वातारणात आपण सदैव मुलींना दटावत असतो. त्याऐवजी मुलांवर संस्कार करणे जास्त गरजेचे आहे. तसे झाले तरच भविष्यात आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतील, असेही सोनालीने म्हटले.