Join us

केदार शिंदेचा नवा कलरफुल सिनेमा "रंगीला रायबा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 14:21 IST

आजपर्यंत एकापेक्षा एक धमाल कलाकृती साकारल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे *रंगीला रायबा* हा एक रंगतदार असा चित्रपट घेऊन येत ...

आजपर्यंत एकापेक्षा एक धमाल कलाकृती साकारल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे *रंगीला रायबा* हा एक रंगतदार असा चित्रपट घेऊन येत आहेत.नुकतेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर "रंगीला रायबा" चे कलरफुल पोस्टर सोशल मिडिया वर प्रसिद्ध करण्यात आले. अॅटीट्युड इज एव्हरिथिंग अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे.दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट वितरक विजय बाबू डी. यांची श्री. विजय साई प्रॉडक्शन ही संस्था आणि या पोस्टरमध्ये दिसणारे फ्रेश चेहरे आल्हाद आणि राधिका हे 'रंगीला रायबा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. अतिशय रंगतदार पोस्टर आणि हटके नाव यामुळे "रंगीला रायबा" अल्पावधीतच सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल  झाला आहे.केदार शिंदे दिग्दर्शित रंगीला रायबा ची कथा त्रिनधा राव यांनी तर पटकथा चिन्मय कुलकर्णी यांची आहे तसेच चिन्मय कुलकर्णी सोबत चेतन डांगे यांनी या चित्रपटाचे खुसखुशीत संवाद लिहिले आहेत,छायालेखन सुरेश देशमाने तर संकलन मनिष मिस्त्री यांनी केले आहे.संगीत पंकज पडघन आणि निषाद तर पार्श्वसंगीत शेखर चंद्रा यांचे आहे.कार्यकारी निर्माता सुरेश शिंदे आहेत.कलरफुल दिवाळीत प्रदर्शित झालेल्या कलरफुल पोस्टरवरचा हा "रंगीला रायबा" १० नोव्हेंबर पासून आपल्याला भेटायला येत आहे.रायबा आणि शुभ्रा यांच्या प्रेमाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. अत्यंत हलकीफुलकी मनोरंजनप्रधान कौटुंबिक अशी ही गोष्ट आहे. रायबा आणि शुभ्रा ही नवी जोडी या चित्रपटामुळे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला फ्रेश लूक देण्यासाठी अत्यंत देखणी आणि ग्लॅमरस जोडीची निवड करून या निर्माता दिग्दर्शक मंडळींनी यशस्वी वाटचाल केली आहे.​केदार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा,श्रीमंत दामोदरपंत, यंदा कर्तव्य आहे, जत्रा यांसारखे अनेक चांगले चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांप्रमाणे मराठी मालिकांचे देखील दिग्दर्शन केले आहे. मधु इथे आणि चंद्र तिथे, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय यांसारख्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. मराठी रंगभूमीला देखील त्यांनी लोचा झाला रे, श्रीमंत दामोदर पंत, गेला उडत, तू तू मी मी, सही रे सही यांसारखी दर्जेदार नाटकं दिली आहेत.मराठीतील एक प्रतिभाशाली दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तो बात पक्की या हिंदी चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते आणि आता ते गुजराती रंगभूमीकडे वळले आहेत.