Join us  

महाराष्ट्रातील नाट्यगृहांची दुरावस्था,या अभिनेत्याने केली पोलखोल.

By अजय परचुरे | Published: June 24, 2019 11:06 AM

महाराष्ट्रातील नाट्यगृहातील सोयीसुविधा सध्या अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. कलाकार सोशल मिडियावर याविरोधात आवाज उठवतायत,मात्र प्रशासन अजूनही ढिम्म आहे.

ठळक मुद्देनाट्यगृहातील प्रसाधनगृहातील अस्वच्छता, एसीतून गळणारे पाणी, गळकी छते अश्या कित्येक कारणांमुळे नाट्यगृहात प्रयोग करणे नामुष्कीचे झाले आहे. नाट्यगृहांची दुरवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे.

मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध अशी परंपरा आहे. त्यामुळेच आपल्या देशात मराठी भाषेत सर्वात जास्त नाट्यप्रयोग महाराष्ट्रभर विविध नाट्यगृहात होत असतात. मात्र या नाट्यगृहांची दुरवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. मराठी नाटकांचे प्रयोग सुरू असताना होणारे अपघात, नाट्यगृहातील प्रसाधनगृहातील अस्वच्छता, एसीतून गळणारे पाणी, गळकी छते अश्या कित्येक कारणांमुळे नाट्यगृहात प्रयोग करणे नामुष्कीचे झाले आहे. याविरोधात अभिनेता आस्ताद काळे याने सोशल मिडियाच्या माध्यमातून पुण्यातील आणि मुंबईतील काही नाट्यगृहांच्या दुरवस्थचे व्हिडिओ लोकांसमोर शेअर केले आहेत. मात्र दोन दिवस हे व्हिडिओ व्हायरल होऊनही संबंधित प्रशासनाने अजूनही यावर कोणताही उपाय केल्याचे निर्दशनास आलेले नाही

आस्ताद काळे  प्रमुख भूमिका करत असलेल्या नाटकाचा शनिवारी पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग होता. प्रयोग सुरू होण्यापूर्वी आस्तादच्या निदर्शनास आले की नाट्यगृहातील भोजनकक्ष आणि मेकअप रूममधील बेसिनचा नळ सतत पाण्याने वाहत आहे. दिवसभर हे नळ वाहत असल्याने कित्येक लीटर पाण्याची नासाडी होत आहे. अनेकवेळा पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना,नाट्यगृह व्यवस्थापकांना ही बाब लक्षात आणून दिल्यावरही जैसे थे परिस्थीतीच असल्याचं चित्र समोर आलं आहे. ह्या गळक्या बेसिनचा व्हिडिओ आस्तादने सोशल मिडियावर पोस्ट केला. क्षणार्धात या पोस्टवर महाराष्ट्रातील विविध भागांतील रंगकर्मींनी त्यावर आपल्या भागातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेच्या गोष्टी सांगितल्या 

रविवारी आस्तादच्या नाटकाचा प्रयोग कल्याणमधील आचार्य अत्रे नाटयगृहात होता. या नाट्यगृहात मेकअपरूम मध्ये असलेल्या प्रसाधनगृहाची अवस्था अत्यंत भयानक होती. प्रसाधनगृहात गेल्यावर येणारा वास, सतत गळणारे पाणी आणि कित्येक दिवस ह्या प्रसाधनगृहाची स्वच्छताच केली नसल्याने तिथे घाणीचं साम्राज्य झालं होतं. याचाही व्हिडिओ आस्तादने पुन्हा एकदा सोशल मिडियावर पोस्ट केला. यापूर्वीही सुमित राघवन आणि नाट्यसृष्टीतील इतर कलाकारांनी मुंबई,पुणे तसेच महाराष्ट्रातील बाहेरगावच्या नाट्यगृहांच्या दुरावस्थेची भयावह कहाणी सोशल मिडियावर मांडली होती. मात्र ह्या नाट्यगृहांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या त्या त्या भागातील महानगरपालिका,नगरपालिका आणि सरकार यांनी यावर कोणतीही उपाययोजना आजपर्यंत केलेली नाही. समाजातील एक महत्वाचा घटक असलेल्या कलाकारांच्या या समस्या सरकारपर्यंत पोहचत नसतील तिथे सामान्यांचे काय ?असा सवाल सोशल मिडियातून नागरिकांकडून विचारला जातोय.