Join us

आशिष भेलकर यांची मराठीत दमदार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 09:47 IST

भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रभाषा हिंदीचा पगडा पहायला मिळतो. त्यातही महाराष्ट्राला बॉलिवूड जवळ असल्याने हिंदी चित्रपटांची मोहिनी मराठी प्रेक्षकांच्या मनामनावर ...

भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रभाषा हिंदीचा पगडा पहायला मिळतो. त्यातही महाराष्ट्राला बॉलिवूड जवळ असल्याने हिंदी चित्रपटांची मोहिनी मराठी प्रेक्षकांच्या मनामनावर भिनली आहे. मोठ्या पडद्यावर कधीही न पाहिलेली भव्यता पाहणं प्रेक्षक आवर्जून पसंत करतात. तोच ग्रँजर आणि बॉलिवूड टच प्रेक्षकांना मनापासून आवडेल असा फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी.एस बाबू निर्मित '३१ दिवस' हा सिनेमा घेऊन दिग्दर्शक आशिष भेलकर मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाले आहेत. बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि प्रभुदेवा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरु केली. 'हिरोईन', 'दिल तो बच्चा है जी', 'आर राजकुमार', 'फॅशन', 'स्वीटी वेड्स एनआरआय' अशा काही सिनेमासाठी असोसिएट  डिरेक्टरची भूमिका पार पडत असताना आशिष यांनी आपला मोर्चा आता मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. '३१ दिवस' ही त्यांची कलाकृती येत्या ६ जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तरुण मनाच्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा सिनेमा असल्याचं आशिष सांगतात, '३१ दिवस' सिनेमाचं वेगळेपण तो प्रत्येकाने पाहिल्यावरच कळेल. पण माझा पहिला सिनेमा एंटरटेनिंग असण्यासोबत  मोटिव्हेशनल असावा असं माझा आग्रह होता. त्यामुळे तशी कथा मिळेपर्यंत वाट पाहून दिग्दर्शनात उतरलो. अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख, रीना अगरवाल, विवेक लागू, सुहिता थत्ते, अशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा उमेश जंगम, छायांकन अनिकेत खंडागळे, संकलन देवेंद्र मुरुडेश्वर, नृत्य दिग्दर्शक वृषाली चव्हाण, अॅक्शन डिरेक्टर सुनील रॉड्रिक्स, संगीत चिनार-महेश यांनी केलं आहे. यापूर्वी मराठीत कधीही न पाहिलेले लोकेशन्स आणि सेट तसेच मराठी चित्रपटांचा गोडवा अबाधित ठेऊन तांत्रिकदृष्ट्या सिनेमाची उंची वाढविण्याचा प्रयत्न '३१ दिवस' सिनेमात असल्याने तो पाहण्यासाठी एक दिवस काढावा अशी प्रेक्षकांची नक्कीच इच्छा होईल असा दृढ विश्वास या सिनेमाचे दिग्दर्शक आशिष भेलकर यांना वाटतो. आपली पहिली कलाकृती मातृभाषेतून व्हावी हा त्याचा अट्टहास असल्याने त्यांनी केलेल्या कामाची नोंद येत्या  ६ जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक घेणार आहेत.