Join us  

जाणून घ्या माधुरी दीक्षित आणि संजय दत्तच्या प्रेमकथेविषयी...

By admin | Published: June 13, 2016 6:03 PM

संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट बनवला जातोय हे ऐकल्यावर माधुरी दीक्षित प्रचंड घाबरली असल्याचे म्हटले जात आहे.

संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट बनवला जातोय हे ऐकल्यावर माधुरी दीक्षित प्रचंड घाबरली असल्याचे म्हटले जात आहे. माधुरी आणि संजय हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते, ते लग्नही करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे संजयच्या आयुष्यावर बनवल्या जाणा-या चित्रपटात माधुरीचा उल्लेख होऊ शकतो, याची भीती माधुरीला आहे. त्यामुळे माधुरीने संजयला फोन करून तिचा उल्लेख वगळण्याची विनंती केली असल्याची चर्चा आहे. संजय आणि माधुरीचे ब्रेकअप होऊन २५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे या जुन्या आठवणी उगळण्यात काय अर्थ आहे, असे माधुरीचे म्हणणे असल्याचे म्हटले जात आहे.

आपण आज जाणून घेऊया माधुरी आणि संजयच्या प्रेमकथेविषयी...माधुरी दीक्षितने फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर काहीच वर्षांत आपले बस्तान बसवले. संजय दत्तही त्याकाळात एक प्रसिद्ध अभिनेता होता. दोघांच्या प्रसिद्धीचा विचार करून त्यांना साजन या चित्रपटासाठी साईन केले गेले. हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माधुरी आणि संजय एकमेकांच्या प्रेमात पडले, असे म्हटले जाते. त्यावेळी संजयचे लग्न झालेले होते आणि त्याला एक मुलगीही होती.साजन हा चित्रपट हिट झाल्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये संजय आणि माधुरी यांची जोडी झळकली. खलनायक या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत माधुरी आणि संजयच्या अफेअरची चर्चा सगळीकडेच सुरू झाली होती. माधुरीच्या कुटुंबीयांनी संजय आणि तिच्या नात्याला विरोध केला होता असेही म्हटले जाते. संजयच्या आयुष्यात माधुरी येण्याआधी त्याचे लग्न झालेले होते. तसेच इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तो ड्रग्स घेत असल्याचे सगळ्यांनाच माहीत होते. या गोष्टींमुळे माधुरीने त्याच्यापासून दूर राहावे असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे होते. पण माधुरीने आपल्या कुटुंबियांचे ऐकले नाही असे म्हटले जाते. माधुरी दिक्षित आणि संजय दत्त यांच्या नात्याची चर्चा अनेकवर्षं सुरू होती. पण त्यांनी आपले नाते कधीच मीडियासमोर कबूल केले नाही. १९९३ला माधुरी आणि संजयचे नाते संपुष्टात आले असे म्हटले जाते. संजय परदेशात चित्रीकरण करत असताना त्याच्याविरोधाच टाडा अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे प्रिया दत्तने त्याला फोन करून सांगितले. संजय भारतात आल्यावर लगेचच त्याला अटक करण्यात आली. या अटकेमुळेच माधुरीने संजयसोबत असलेले नाते तोडले असे म्हटले जाते. संजय चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच त्याच्या ड्रग्सच्या सवयीमुळे त्याचे नाव प्रचंड खराब झाले होते. इंडस्ट्रीत स्तिरावल्यावर संजयने आपली बॅड बॉय इमेज मागे ठेवली असे सगळ्यांना वाटत होते. पण टाडा प्रकरणामुळे सगळ्यांनाच आश्र्चर्याचा धक्का बसला होता. या घटनेमुळे माधुरी प्रचंड नाराज झाली असल्याचे म्हटले जाते. माधुरी दिक्षित, संजय दत्त यांनी ठाणेदार, खलनायक, साजन, साहिबा, कानून अपना अपना, महानता, खतरों के खिलाडी, इलाका यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले. माधुरी आणि संजयची प्रेमकथा नव्वदीच्या दशकात प्रचंड गाजली होती. ब्रेकअपनंतर काही वर्षांनी माधुरीने अमेरिकास्थित डॉ. श्रीराम नेनेसोबत लग्न केले तर संजयने रिचा शर्मा या त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर रिया पिल्लई या मॉडेलशी लग्न केले.रियासोबत घटस्फोट घेतल्यानंतर २००८ साली त्याने मान्यताशी लग्न केले.