Join us  

..."त्या" निर्णयामुळे विनोद खन्नांच्या पुढे निघून गेले अमिताभ

By admin | Published: April 27, 2017 1:06 PM

बॉलिवूडचे 60च्या दशकातले सुपरस्टार विनोद खन्ना यांचं मुंबईत निधन झालं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - बॉलिवूडचे 60च्या दशकातले सुपरस्टार विनोद खन्ना यांचं मुंबईत निधन झालं आहे. सोशल मीडियावर ही बातमी वा-यासारखी पसरल्यानंतर अनेक जण त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत. विनोद खन्ना यांच्या आयुष्यात अनेक व्यक्ती आल्या. तरीही बिग बी आणि विनोद खन्ना यांची मैत्री कायम चर्चेत राहिली. काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवर विनोद खन्नांसंदर्भात एक भावनिक पोस्ट लिहिली होती. बिग बींची ती पोस्ट खूपच चर्चेत आली होती. 1969मधल्या मन का मीत या चित्रपटापासून विनोद खन्ना यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1976ला बॉक्स ऑफिसवर झळकलेल्या हेरा-फेरी या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि इमोशनची सांगड घालण्यात आली होती. या चित्रपटातून एकत्र आलेली अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांची जोडी प्रेक्षकांना भावली. 1977मध्ये पुन्हा एकदा खून पसीना या चित्रपटात विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी लोकांचं मनोरंजन केलं. मात्र या चित्रपटात ते एकमेकांच्या मित्राऐवजी शत्रू दाखवण्यात आले होते. शूटिंगच्या वेळी त्यांच्यात मतभेदाच्या घटना समोर आल्या होत्या. अमर अकबर अँथोनी या चित्रपटात अमिताभ, विनोद खन्ना आणि ऋषी कपूरही होते. विनोद खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला प्रकाश मेहरा यांचा 1978मध्ये आलेला "मुकद्दर का सिकंदर" हा चित्रपट सर्वात हिट ठरला होता. या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटाला सिल्व्हर ज्युबिली अवॉर्डही मिळालं होतं. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्यात ऑन स्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त होती. विनोद खन्ना यांनी जीवनात एक निर्णय घेतला नसता तर आज अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाची चित्रपटसृष्टीत त्यांची कारकीर्द उजवी ठरली असती. विनोद खन्ना अर्ध्यावरच चित्रपटसृष्टी सोडून आचार्य रजनीश यांच्यासोबत अमेरिकेला जाऊन ओशोंच्या आश्रमात राहायला लागले. या निर्णयानंतर विनोद खन्नांची चित्रपट कारकीर्द काहीशी थांबली आणि त्यांच्या वैवाहिक जीवनावरही याचा प्रभाव पडला. काही काळानंतर विनोद खन्ना यांचा आश्रम आणि ओशोंशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची ती एंट्री एवढी दमदार ठरली नाही. त्या काळात त्यांचे दयावान आणि चांदनी हे दोनच चित्रपट हिट झाले. विनोद खन्नांनी राजकारणातही प्रवेश केला होता. ते काही काळ गुरदासपूरमधून खासदारही होते. कॅन्सर असल्यामुळे ते मीडिया आणि कॅमे-यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असत.