अंध व कर्णबधिर यांना चित्रपटाचा अनुभव देण्यासाठी ‘चौर्य’ या चित्रपटात ‘अक्सेसिब्लिटी फॉरमॅट’ या वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असा प्रयोग प्रथमच केला जात आहे. या अनोख्या प्रयोगाची दखल थेट केंद्र सरकारने घेतली असून, या पुढाकाराचे कौतुक करणारे पत्र भारत सरकारने दिले आहे. नवलाखा आर्टस् व होली बेसिल कंबाईनचे नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकिजच्या अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, राजन आमले हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आर्टस् व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमानाने केली आहे. या आधी शाळा, फँड्री, सिद्धांत अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती नवलाखा आर्टस् व होली बेसिल कंबाईनने केली आहे.आशय सहस्रबुद्धे या आमच्या मित्राने या विषयात पीएच.डी. केली असून, ‘अॅक्सेसिब्लिटी फॉरमॅट’चे तंत्रज्ञान ‘चौर्य’साठी उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक करणारे पत्र केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट आॅफ एम्पॉवरमेंट आॅफ पर्सन विथ डिसअॅबिलिटीज्’चे संयुक्त सचिव मुकेश जैन यांनी पाठविले असून, त्यामुळे अंध आणि कर्णबधिरदेखील या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते नीलेश नवलखा यांनी दिली. नव्या दमाचा लेखक समीर आशा पाटील या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे, तसेच या चित्रपटात अभिनेते किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि आरजे श्रुती आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘चौर्य’ हा चित्रपट ५ आॅगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘चौर्य’ची केंद्र सरकारकडून दखल
By admin | Updated: July 31, 2016 02:04 IST