Join us

काही तासांतच मुंबईत पोहोचणार श्रीदेवी यांचे पार्थिव; मात्र उद्या होणार अंत्यसंस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 19:54 IST

सुपरस्टार श्रीदेवी यांचे पार्थिव अजूनही दुबईमध्येच असून, भारतात आणण्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे काही तासांतच बोनी ...

सुपरस्टार श्रीदेवी यांचे पार्थिव अजूनही दुबईमध्येच असून, भारतात आणण्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे काही तासांतच बोनी कपूर मुलगा अर्जुन कपूरसोबत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईला घेऊन येणार आहेत. दुबई पोलीस आणि पब्लिक प्रॉसिक्यूशन आॅफिसने ४८ तासांच्या चौकशीनंतर कपूर परिवाराकडे श्रीदेवी यांचे पार्थिव सोपविले. त्याचबरोबर दुबई येथून भारतात नेण्यास परवानगीही दिली. असे म्हटले जात आहे की, श्रीदेवी यांचे पार्थिव रात्री ९ वाजेपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्या त्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कपूर परिवाराशी अतिशय जवळचे संबंध असलेले अमर सिंग यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, ‘दुबई पब्लिक प्रॉसिक्यूशनने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. मी आता माझ्या मीडियातील मित्रांना आणि सुब्रह्मण्यमस्वामी यांना विनंती करतो की, त्यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल चुकीच्या बातम्या पसरविणे थांबवावे. श्रीदेवीचे पार्थिव आज रात्रीपर्यंत भारतात आणले जाईल. ज्यानंतर उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.’दरम्यान, अभिनेत्री श्रीदेवी यांनी वयाच्या ५४व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मोहित मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी परिवारासोबत दुबईला गेल्या होत्या. याठिकाणीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये ‘धडक’ या चित्रपटातून एंट्री करणार आहे. परंतु आपल्या लेकीचा डेब्यू बघण्यासाठी श्रीदेवी आता या जगात नसणार.