Join us  

संजय दत्त पोहोचला होता ऋषी कपूर यांना मारायला, मग घडले असे काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 12:45 PM

संजय दत्तच्या प्रेयसीचे ऋषी कपूर यांच्यासोबत अफेअर असल्याची शंका संजयला आली होती. त्यामुळे तो चांगलाच चिडला होता.

ठळक मुद्देसंजू आणि टीना मुनिम दोघे त्यावेळी नात्यात होते आणि त्यांच्या ब्रेकअपनंतर चिंटू (ऋषी कपूर) आणि टीनाचे अफेअर सुरू असल्याची संजयला शंका आली होती.

बॉलिवूडमधील काही किस्से हे प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यातील एक किस्सा हा संजय दत्त आणि ऋषी कपूर यांचा आहे. संजय दत्त चिडून ऋषी कपूर यांना मारायला गेले होते. पण नीतू कपूर यांच्यामुळे संजय दत्तचा राग शांत झाला होता. नीतू आणि ऋषी कपूर यांचे लग्न होण्याच्याआधीचा हा किस्सा आहे.

संजय दत्तच्या प्रेयसीचे ऋषी कपूर यांच्यासोबत अफेअर असल्याची शंका संजयला आली होती. त्यामुळे तो गुलशन ग्रोव्हरला घेऊन ऋषी कपूर यांच्या घरी त्यांना मारायला गेला होता. रॉकी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याआधीच टीना मुनिम आणि संजय यांची चांगलीच मैत्री होती. रॉकी या चित्रपटानंतर ते जवळजवळ दोन वर्षं नात्यात होते. पण संजय दारू, ड्रग्सच्या अधीन गेला असल्याने टीनाने त्याच्यासोबत ब्रेकअप केले. त्यांच्या ब्रेकअपनंतर टीना ऋषी कपूरयांच्या सोबत एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऋषी आणि टीना एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या चर्चांना ऊत आले होते.

या सगळ्या चर्चा ऐकून संजय प्रचंड चिडला होता आणि त्याने ऋषी कपूर यांच्या त्याच्या घरी जाऊन मारायचे असे ठरवले. ऋषी यांच्या घरी जाताना तो त्याचा अतिशय जवळचा मित्र गुलशन ग्रोव्हरला देखील सोबत घेऊन गेला होता. पण नीतू कपूर यांनी मध्यस्ती करत संजय दत्तचा राग शांत केला. या किस्स्याविषयी गुलशन ग्रोव्हरनेच एका मुलाखतीत सांगितले होते.

त्याने म्हटले होते की, संजू आणि टीना मुनिम दोघे त्यावेळी नात्यात होते आणि त्यांच्या ब्रेकअपनंतर चिंटू (ऋषी कपूर) आणि टीनाचे अफेअर सुरू असल्याची संजयला शंका आली होती. मी आणि संजू एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असल्याने त्याने मला याविषयी सांगितले. त्यामुळे आम्ही चिंटूच्या घरी जाऊन त्याला मारायचे ठरवले होते. पण आम्ही घरी पोहोचलो, त्यावेळी तिथे नितू होती. तिने संजूला समजावले की, ऋषी आणि टीना यांच्यात अफेअर नाहीये. या सगळ्या केवळ अफवा आहेत. त्यामुळेच मी आणि संजू ऋषीच्या घरातून निघून गेलो. ही घटना घडल्यानंतर काहीच महिन्यात ऋषी आणि नितू यांचे लग्न झाले होते.

टॅग्स :संजय दत्तऋषी कपूर