Join us  

शाहरुख खानला या कारणामुळे खावी लागली होती तुरुंगाची हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 7:30 PM

शाहरुख खानला कधी तुरुंगाची हवा खायला लागली होती असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला हे पटेल का? हो, हे खरे आहे.

ठळक मुद्देशाहरुखने या कार्यक्रमात सांगितले की, त्याला काही वर्षांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याला एक दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. घरी जाण्यासाठी तो पोलिसांकडे विनंती करत होता. पण त्यांनी त्याचे काहीही ऐकलेले नव्हते.

शाहरुख खान आज बॉलिवूडचा बादशहा असून त्याने एकाहून हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. शाहरुख खानला कधी तुरुंगाची हवा खायला लागली होती असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला हे पटेल का? हो, हे खरे आहे. करियरच्या सुरुवातीला शाहरुख खानला एका दिवसांचा तुंरुगवास झाला होता. त्यानेच नुकतीच ही गोष्ट एका कार्यक्रमात सांगितली आहे. हे ऐकल्यावर त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. 

शाहरुख खानने डेव्हिड लेटरमन या प्रसिद्ध अमेरिकन होस्ट यांच्या माय नेक्स्ट गेस्ट नीड नो इंट्रोडक्शन या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक रहस्य उलगडली असून विविध गोष्टींवर भाष्य केली आहेत. त्याने या कार्यक्रमात सांगितलेली काही सिक्रेट्स ऐकून त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. शाहरुखने या कार्यक्रमात सांगितले की, त्याला काही वर्षांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याला एक दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. घरी जाण्यासाठी तो पोलिसांकडे विनंती करत होता. पण त्यांनी त्याचे काहीही ऐकलेले नव्हते.

शाहरुख खानने त्याच्या करियरच्या सुरुवातीला माया मेमसाब या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्यावेळी एका मासिकात बातमी आली होती की, या चित्रपटातील अभिनेत्रीला म्हणजेच दीपा साही आणि शाहरुख यांना या चित्रपटात एक इंटिमेट दृश्य द्यायचे होते. हे दृश्य चांगल्याप्रकारे साकारता यावे यासाठी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने म्हणजेच केतन मेहता यांनी या दोघांना एक रात्र हॉटेलमध्ये एकत्र घालवण्याचा सल्ला दिला होता. केतन मेहता आणि दीपा साही यांचे त्यावेळी लग्न झाले होते. ही बातमी ऐकून शाहरुखला प्रचंड राग आला होता आणि त्याने मासिकाच्या संपादकाला याविषयी जाब विचारला होता. पण त्याने फोनवर हा केवळ विनोद होता असे उत्तर दिले होते. हे ऐकून शाहरुख चिडला आणि संपादकाच्या कार्यालयात जाऊन त्याने गोंधळ घातला होता आणि तेथील लोकांना मारहाण करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संपादकाने शाहरुखच्या विरोधात केस दाखल केली होती आणि याचमुळे शाहरुखला अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :शाहरुख खान