Join us  

अचानक का सोडले बॉलिवूड? तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 9:22 AM

‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री  तनुश्री दत्ता सध्या चर्चेत आहे. बॉलिवूडमधून गेली अनेक वर्षे गायब असलेली तनुश्री गत दोन महिन्यांपासून भारतात आहे.

‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री  तनुश्री दत्ता सध्या चर्चेत आहे. बॉलिवूडमधून गेली अनेक वर्षे गायब असलेली तनुश्री गत दोन महिन्यांपासून भारतात आहे. यादरम्यान मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यापैकी एक म्हणजे, तनुश्रीने अचानक बॉलिवूड का सोडले? एका मुलाखतीत तिला हा प्रश्न केला गेला. या प्रश्नावर तिने थेट नाना पाटेकरचे नाव घेतले. नाना पाटेकरमुळे मी बॉलिवूड सोडले, असे ती म्हणाली.२००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’च्या शूटींगदरम्यान तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर छेडखानी केल्याचा आरोप केला होता. तिच्या या आरोपानंतर मेकर्सनी तनुश्रीला या चित्रपटातून डच्चू देत, तिच्या जागी राखी सावंतला घेतले होते. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या एका गाण्याचे शूट सुरू होते. या गाण्याला गणेश आचार्य कोरिओग्राफ करीत होता. यादरम्यान नानाने मला मिठी मारली आणि डान्स स्टेप्स शिकवायला सुरुवात केली, असा आरोप तनुश्रीने केला. कुणाला काही कळायच्या आत मी शूटींग सोडून पळत वॅनिटी व्हॅनमध्ये गेली. ही गोष्ट  सेटवर उपस्थित असलेल्या तनुच्या आईला समजली आणि तिने एकच गोंधळ घातला. घटनेची कुठलीही खातरजमा न करताच तनुश्रीच्या आईने काही पत्रकारांना बोलाविले. नानाने मात्र याकडे दुर्लक्ष करीत सेट सोडला. पत्रकारांनी तनुश्रीला या घटनेविषयी विचारले तेव्हा तिने काहीही न सांगता, थेट पोलीस ठाणे गाठत नानाच्या विरोधात एफआयआर नोंदविला. यानंतर काय घडले हे कोणालाही कळले नाही. मात्र यामुळे तनुश्रीला इंडस्ट्रीमधून कायमचे गायब व्हावे लागल़. या एपिसोडनंतर तनुश्रीला इंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले आणि यानंतर तनुश्रीने मुंबई सोडण्याचाच निर्णय घेतला. 

 

बॉलिवूड सोडून ती अध्यात्माच्या वाटेवर निघाली. तिने हा निर्णय का घेतला, हे कुणालाच कळले नाही. मन:शांतीच्या शोधात तनुश्री अनेक ठिकाणी फिरली. पुढे युएसमध्ये गेली. पण इथून परतली तेव्हा ती पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेली होती. याकाळात तिच्या एका मित्राने तिला योगविद्येशी जुळण्याचा सल्ला दिला. पण इथेही तिचे मन रमले नाही. मग तिने लडाखचा मार्ग जवळ केला. डोक्याचे मुंडण सुद्धा करून घेतले. यापश्चात अनेक आश्रमात ती राहिली. पुढे अचानक ख्रिश्चन धर्म स्वीकारला.