Join us  

पतीचे धाकट्या बहिणीशी प्रेमसंबंध होते, शेवटच्या दिवसांमध्ये झाली दुर्दशा; तीन दिवस अभिनेत्रीचा मृतदेह घरात सडून राहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:27 PM

शेवटच्या दिवसांमध्ये अभिनेत्रीची दुर्दशा झाली. तिच्या निधनाची बातमीही साऱ्यांना तीन दिवसांनी कळली. पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडला असता त्यांचा तीन दिवस जुना मृतदेह आढळून आला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचा आज (18 एप्रिल) वाढदिवस आहे. ललिता पवार आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका कुणीही विसरू शकत नाही. हिंदी, मराठी आणि गुजराती असे 700 वर सिनेमे करणा-या ललिता यांनी अनाडी, श्री420, मिस्टर अँड मिसेस 55 या सिनेमात यादगार भूमिका साकारल्या. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी साकारलेली मंथराची भूमिकाही यादगार व ऐतिहासिक ठरली.

बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. पुढे अभिनेत्री म्हणून नवी इनिंग सुरु केल्यानंतर ललिता यांनी अनेक बोल्ड फोटोशूट केले होते. त्या काळात असे फोटोशूट खूप मोठी गोष्ट होती. ललिता यांचा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि या हिटने त्यांच्या करिअरला गती दिली. त्याकाळात सर्वाधिक फी घेणा-या अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जात. करिअरच्या शिखरावर असताना एका घटनेने मात्र त्यांचे पुरते आयुष्य बदलले होते. ‘जंग ए आजादी’ या सिनेमाचे शूटींग सुरू होते. या सिनेमाच्या एका सीनमध्ये भगवान दादा यांना ललिता यांना थप्पड मारायची होती. या सीनमध्ये भगवान दादांनी ललितांना इतकी जोरदार थप्पड लगावली की, ललिता जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले.

कानाचा उपचार सुरु असताना डॉक्टरांनी ललिता यांना चुकीची औषधे दिलीत आणि या औषधांमुळे त्यांना लकवा मारला. यामुळे त्यांचा डावा डोळ्यात दोष निर्माण झाला. सतत तीन वर्षे उपचार करून देखील त्यांच्या डोळ्यातील हा दोष दूर झाला नाही. यानंतर नायिकेच्या भूमिका मिळणार नव्हत्याच. यामुळे त्यांनी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारायला सुरुवात केली. चरित्र अभिनेत्रींच्या भूमिकाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने पडद्यावर जिवंत केल्या.

 ललिता यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ- उतारांचे पाहिले. ललिता यांचे पहिले लग्न गणपतराव पवार यांच्याशी झालेल. पण त्यांच्या पतीचे ललिता यांच्या धाकट्या बहिणीशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे अभिनेत्रीने गणपतरावांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांनी चित्रपट निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले.

ललिता यांच्या आयुष्यातील अडचणी कधी संपल्याच नाहीत. त्यांना तोंडाचा कर्करोग झाला होता, त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारही सुरू होते. पण त्यांचा शेवटचा काळ अत्यंत वाईट गेला. जेव्हा ललिता यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्या बंगल्यात एकट्या होत्या आणि पती रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी ललिता यांना पाणी द्यायलाही कोणी नव्हते. २४ फेब्रुवारी १९८८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. दुःखद बाब म्हणजे त्यांच्या निधनाची बातमीही साऱ्यांना तीन दिवसांनी कळली. पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडला असता त्यांचा तीन दिवस जुना मृतदेह आढळून आला होता.

 

टॅग्स :सेलिब्रिटी