Join us

इंडस्ट्रीत ‘गॉडफादर’ नसेल तर स्ट्रगल अटळ : विवान शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 16:15 IST

विवानच्या आगामी ‘लाली की शादी मे लड्डू दीवाना’ या चित्रपटानिमित्त त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने दिलखुलासपणे आपली मते व्यक्त केली.

सतीश डोंगरेवडील प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह, आई अभिनेत्री रत्ना पाठक आणि भाऊ अभिनेता इमाद शहा असा भक्कम वारसा लाभलेला असतानाही स्वकर्तृत्वाने इंडस्ट्रीत मार्ग शोधणारा हुरहुन्नरी अभिनेता विवान शहा याचा आतापर्यंतचा प्रवास संघर्षात्मक राहिला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र त्याच्या या प्रवासात कुटुंबाकडून मिळालेला भक्कम वारसाच त्याला इंडस्ट्रीमध्ये स्थिर करण्यास मदतशीर झाल्याचे विवान सांगतो. त्याच्या मते, १९९० च्या तुलनेत सद्यस्थितीत इंडस्ट्रीत बराचसा बदल झाल्याने तुमच्यावर एखाद्या ‘गॉडफादर’चा हात असायलाच हवा, अन्यथा स्ट्रगल अटळ आहे. विवानच्या आगामी ‘लाली की शादी मे लड्डू दीवाना’ या चित्रपटानिमित्त त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने दिलखुलासपणे आपली मते व्यक्त केली. प्रश्न : तुझ्या परिवाराचे इंडस्ट्रीत मोठे योगदान आहे, अशातही तू तुझी वेगळी वाट निवडली आहे, काय कारण?- होय, मी स्वत:च्या हिमतीवर इंडस्ट्रीत आलो. परंतु आतापर्यंतच्या प्रवासात माझ्या कौटुंबिक वारशाचाच अधिक विचार केला गेला, हेही नाकारता येणार नाही. वास्तविक कुठलेही यश सहजासहजी मिळाले की त्याची फारशी किंमत राहत नाही. याउलट स्ट्रगल करून मिळवलेल्या यशाची चव चाखण्याची मजा काही औरच असते. इंडस्ट्रीत येताना मी स्ट्रगल अ‍ॅक्टर म्हणून येऊ इच्छित होतो. मुळात माझ्या परिवारांकडूनच ही शिकवण मिळाली असल्याने मी स्वकर्तृत्वाने स्वत:ला सिद्ध करायचे ठरविले. परंतु दुसरी बाजू बघितल्यास मी जर शहा परिवारातून नसतो, तर कदाचित मला कोणीही विचारले नसते. आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये मी झळकलो, त्यांच्या निर्मात्यांनी मला लहानाचे मोठे होताना बघितले. त्यामुळे मी त्यांच्या स्मरणात होतो व मला संधी मिळत गेल्या. मात्र, या दरम्यान मला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली; ती म्हणजे इंडस्ट्रीत जर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर तुमचा ‘गॉडफादर’ असायलाच हवा, अन्यथा स्ट्रगल अटळ आहे. प्रश्न : ज्यांना ‘गॉडफादर’ नाही अशा स्ट्रगल अ‍ॅक्टर्सबाबतचा तुझा अनुभव कसा सांगणार?- एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, ९० च्या दशकाच्या तुलनेत सद्यस्थितीत बॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मितीची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे एखाद्या चित्रपटाची आॅफर देताना अभिनयाबरोबरच पार्श्वभूमीचाही विचार केला जातो, असे मला जाणवले. कारण ज्याच्या परिवारातील एखादा सदस्य इंडस्ट्रीमध्ये पूर्वीपासूनच असेल तर इंडस्ट्रीतील इतर लोक त्या सदस्याच्या परिवारातील इतरांनाही ओळखून असतात. मात्र ज्याचा इंडस्ट्रीशी काहीएक संबंध नाही, अशा स्ट्रगल कलाकारांना सुरुवातीपासूनच स्ट्रगल करावे लागते. येत्या काळात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.प्रश्न : तू अद्यापपर्यंत एकाही चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला नाहीस, त्या भूमिकेचा तू अजूनही शोध घेत आहेस का?- नक्कीच, पण आगामी ‘लाली की शादी मे लड्डू दीवाना’ या चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारत आहे. माझ्याबरोबर गुरुमित चौधरी याचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. वास्तविक एखाद्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणे ही खूप मोठी जबाबदारी असते. तुमच्या स्वत:च्या हिमतीवर तुम्हाला प्रेक्षकांना सिनेमागृहात आणावे लागते. या चित्रपटाच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. मात्र अशातही मला ‘त्या’ भूमिकेचा शोध आहे. मला विश्वास आहे की, लवकरच माझा हा शोध संपेल. एखाद्यावेळेस याच वर्षात मी अशा भूमिकेत प्रेक्षकांना बघावयास मिळणार. प्रश्न : आई, वडील, भाऊ यांच्याबरोबर एकत्र काम करण्याचा तू कधी विचार करतोस का? - होय, असे झाल्यास तो माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असेल. सध्या मी त्या संधीच्या शोधात आहे. वास्तविक मी वडील नसिरुद्दीन शहा यांच्याबरोबर २०११ मध्ये आलेल्या ‘सात खून माफ’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु चित्रपटात असा एकही सीन नव्हता ज्यात आम्ही समोरा-समोर आलो. त्यामुळे त्यांच्यासोबत चित्रपट करणे हे माझे स्वप्न आहे. वास्तविक आम्ही थिएटर्स एकत्र केले आहे. तसेच नुकताच पृथ्वी थिएटर्ससाठी आम्ही एक प्ले केला होता, ज्यामध्ये मी, माझे आई-वडील, भाऊ-बहीण असे सर्वच होतो. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला. याच प्लेचे दुबई, सिंगापूरसह भारतातील दिल्ली, बंगळुरू याठिकाणीही काही शो आम्ही करीत आहोत. एक कॉमेडी प्ले असून, आम्ही सगळेच यास एन्जॉय करीत आहोत. प्रश्न : ‘लाली की शादी मे लड्डू दीवाना’ या चित्रपटाविषयी काय सांगशील?- हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास खरा उतरेल याची मला खात्री आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटात तो सगळाच मसाला आहे, जो प्रेक्षकांना भावतो. चित्रपटात माझी आणि गुरुमित चौधरीची चांगली केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे. चित्रपट कॉमेडी जरी असला तरी त्यात आपल्या संस्कृतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.