लहानपणी गर्दीत लहान मुलांची ताटातूट झालेली आपण बऱ्याचदा ऐकली आहे, कित्येकांनी तर अनुभवलीदेखील आहे. मुंबईसारख्या शहरांत तर रोजच अशा घटना कदाचित घडत असतील. कधी हे ताटातूट झालेले आई-वडील आणि मुलांची भेट होते तर कधी वर्षानुवर्षे ते भेटूही शकत नाहीत. तर कधी या शोध मोहिमेत ते मजल दरमजल करत गावच काय अगदी राष्ट्रंही बदलली जातात. त्यातूनही एखाद्या देवासारख्या व्यक्तीने हरवलेल्या मुलाचा सांभाळ करून त्याला वाढवले़ ते मूलही त्या व्यक्तीलाच स्वत:चे आई-वडील मानू लागतं आणि संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठीच जगून सेवा करतं. यामध्ये मग नात्यांचे नवीन ऋणानुबंधही जुळतात, जे तुटणं केवळ अशक्य असतं. त्यामुळे आपल्या माणसांचा शोध घेताना होणारा प्रवास हा केवळ शारीरिक नसतो तर मनाचाही असतो. कारण या प्रवासात येणाऱ्या अनुभवानुरूप प्रत्येकाची मन:स्थितीही बदलत असते. असाच काहीसा विषय आपल्यासमोर घेऊन येत आहेत एऩआऱआय़ दिग्दर्शक नितीन अडसूळ ‘परतू’ या चित्रपटामधून. ‘परतू’ या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे ईस्ट वेस्ट या अमेरिकन कंपनीने निर्मित केलेला हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे. येत्या ४ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त परतू चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते नितीन अडसूळ, निर्माते डॅरेल कॉक्स, सचिन अडसूळ, अभिनेता सौरभ गोखले, अभिनेत्री स्मिता तांबे आणि गायत्री सोहम आदी कलाकारांनी शुक्रवारी लोकमत कार्यालयाला भेट दिली. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक नितीन अडसूळ सांगतात, हा चित्रपट एका वास्तव घटनेवर आधारित आहे. दोन सख्ख्या भावांच्या वडिलांच्या मामासोबत घडलेली ही घटना आहे. बरीच वर्षं आधी वडिलांनी ही गोष्ट मला सांगितली होती. त्यामुळे त्यावर चित्रपट करावा का, असा विचार डोक्यात होता. मी कथा सांगितल्यावर चित्रपटाचे इतर निर्माते डॅरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलन, रूपेश महाजन आणि सचिन अडसूळ यांना ऐकवली आणि त्यांनीही चित्रपट करण्याबद्दल तयारी दर्शवली. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे याची कथा प्रथम क्लार्क मॅकमिलन आणि मी इंग्लिशमध्ये लिहिली आणि मग त्याचे मराठीत भाषांतर करण्यात आले.हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेच, पण त्याबरोबर तो हृदयस्पर्शी व संवेदनशीलही आहे. त्यामुळे बऱ्याच स्क्रिप्ट पाहिल्यानंतर ही स्क्रिप्ट निवडली. कारण हे तीन महत्त्वाचे घटक या स्क्रिप्टमध्ये होते. इतकेच नव्हे तर एक सामाजिक संदेशही या चित्रपटातून दिला जातो. म्हणून या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले.- डॅरेल कॉक्स, निर्मातामी आजवर शहरी किंवा ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. पण या चित्रपटात एक पूर्ण वेगळं गावरान बाज असलेला, थोडासा रांगडा असलेल्या पृथ्वी या मुलाची भूमिका साकारत आहे. तो आई-वडिलांशी, भावाशी खूप अटॅच असतो. गावातला असला तरी काहीशा पुढारलेल्या विचारांचा, पण आई-वडिलांच्या कष्टाची जाण असलेला हा मुलगा आहे.- सौरभ गोखले, अभिनेता१९६८ ते १९८५ या दरम्यान घडलेली कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातून कथेची सुरुवात होते आणि ती थेट राजस्थानपर्यंत पोहोचते. त्यामुळे महाराष्ट्र-राजस्थान असा एक वेगळा मिलाफही पाहायला यामध्ये मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील सिन्नर तालुक्यापासून २४ किमीवर असलेल्या हिवरे पिंपळ गावामध्ये, निफाडला आणि राजस्थानमधील जोधपूरपासून ७८ किमीवर कोसिया, तिथून पुढे २४ किमीवर असलेल्या एका वाळवंटामध्ये शूटिंग करण्यात आलं आहे. तसेच काही भाग मुंबईतलाही बघायला मिळेल. -नितीन अडसूळ, निर्माते व दिग्दर्शकमराठी चित्रपट इथल्याच मातीत बनून परदेशात जाऊन ग्लोबल झाला आहे. पण या चित्रपटाबद्दल सांगायला अभिमान वाटतो, की चित्रपटाचे चारही निर्माते हे अमेरिकेत स्थायिक आहेत आणि त्यांनी तिथे या चित्रपटाची कथा लिहून भारतात येऊन चित्रपट ग्लोबल केला तेही अमेरिकन कंपनीच्या साहाय्याने आणि तो अमेरिकेत दाखवून खऱ्या अर्थाने ग्लोबल केला. इतकंच नाही तर डीसी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट अभिनेता म्हणून किशोर कदम यांना तर बेस्ट फीचर फिल्मचा अॅवॉर्ड ‘परतू’ला मिळाला आहे. - सचिन अडसूळ, निर्मातेहा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि माझ्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये मी शोभा नावाची भूमिका साकारत आहे जिला स्वत:चे स्वतंत्र विचार आहेत. म्हणजे अगदी चित्रपटातील प्रत्येक पात्राचं एक स्वत:च असं महत्त्वं आहे. विशेष म्हणजे सत्य घटनेवर आधारित चित्रपट असला तरी कुठेही मालमसाला न घालता अत्यंत साधेपणाने हा चित्रपट साकारण्यात आला आहे, त्यामुळे तो जास्त भावतो.- गायत्री सोहम, अभिनेत्रीया चित्रपटामुळे माझ्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्नं पूर्ण झालं आहे, असं मला वाटतं. यामध्ये मी सुगंधा नावाचं पात्र साकारत आहे. जिला काहीही विचार न करता केवळ आयुष्य कसं जगायचं इतकंच ठाऊक असतं. तिच्यामुळे मला वय वर्ष २५ ते ६० इतक्या मोठ्या वयोगटा- दरम्यानच्या महिलेची भूमिका साकारता आली. ही भूमिका मला स्वत:ला खूप भावली कारण रक्ताच्या नात्याच्या पलीकडेही एक नातं असतं आणि ती जेव्हा तयार होतात त्याला माणुसकी म्हणतात. अशा माणुसकीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.- स्मिता तांबे, अभिनेत्री
रक्ताच्या नात्यापलीकडे असलेलं एक नातं ‘परतू’
By admin | Updated: November 22, 2015 03:28 IST