ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - बॉलिवूडमध्ये नायक-नायिकांची अनेक प्रेम प्रकरणे झाली. पण आजही सर्वाधिक चर्चा होते ती महानायक अमिताभ बच्चन आणि रेखाच्या प्रेमसंबंधांची. बॉलिवू़डमध्ये ८० च्या दशकात गाजलेल्या या जोडीबद्दल प्रेक्षकांना आजही आकर्षण आहे.
अमिताभ-रेखाच्या प्रेम संबंधांविषयी जेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये रोज छापून यायला लागले तेव्हा जया बच्चन प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या. स्टारडस्ट मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार 'मुकद्दर का सिंकदर' चित्रपटाच्या ट्रायल शो च्यावेळी रेखाला जयाबच्चन यांच्या मनात तिच्याविषयी किती संताप आहे ते समजले.
मुकद्दर का सिंकदर चित्रपटाच्या ट्रायल शो च्यावेळी प्रोजेक्शन रुममधून मी संपूर्ण बच्चन कुटुंबाला पाहत होते. जया आणि अमिताभ पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्या मागे अमिताभचे आई-वडील बसले होते. चित्रपटातील आमच्या दोघांमधील एका लव्हसीनच्यावेळी मला जयाच्या डोळयात अश्रू दिसले.
त्यानंतर आठवडयाभराने मला इंडस्ट्रीतील अनेकांनी अमिताभ तुझ्यासोबत काम करणार नाही असे सांगितले. पण अमिताभने स्वत:हून मला काही सांगितले नाही असा रेखाच्या आत्मचरित्रात उल्लेख आहे. मुकद्दर का सिंकदर हा या जोडीचा अखेरचा चित्रपट होता.