Atal Pension Yojna : फेब्रुवारी महिन्यातील १ तारीख सर्व भारतीयांच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. कारण, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दिवशी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळच्या अर्थसंकल्पात सरकार अटल पेन्शन योजनेबाबत (APY) मोठी घोषणा करू शकते, अशी अपेक्षा आहे. सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी, सरकार योजनेंतर्गत मिळणाऱ्या किमान निवृत्तीवेतनाची रक्कम दुप्पट करू शकते. सध्या किमान मासिक पेन्शनची रक्कम १,००० ते ५,००० रुपये आहे. वास्तविक, तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या योगदानावर अवलंबून आहे.
मासिक पेन्शन दुप्पट करण्याची सरकारची योजनासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला सरकार मंजुरी देऊ शकते. किमान हमी रक्कम १०,००० रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्याची घोषणा अर्थसंकल्पात होऊ शकते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सरकारने अटल पेन्शन योजना (APY) सुरू केली आहे. साल २०१५-१६ मध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत पैसे जमा करणाऱ्यांना १,००० रुपये ते ५,००० रुपये मासिक पेन्शन मिळते.
काय आहे याजनेचं वैशिष्ट्य?अटल पेन्शन योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला संपूर्ण रक्कम मिळते. अटल पेन्शन योजना खाते उघडण्यासाठी, वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे लागते. जर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुमचे बचत खाते असलेल्या बँकेतून नोंदणी फॉर्म घ्या किंवा वेबसाइटवरून डाउनलोड करा. यानंतर, फॉर्ममध्ये तपशील भरा आणि पेन्शन पर्याय निवडा. त्यानंतर आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा.