Join us

प्रदूषणाच्या आधारावर शहरातील प्रॉपर्टीचे दर ठरणार? उद्योगपतीच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:10 IST

Air Quality Index : राजधानी दिल्लीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावर एका उद्योगपतीने एक पर्याय दिला आहे.

Zerodha's Nithin Kamath idea : गेल्या काही वर्षांपासून राजधानी दिल्लीतीलप्रदूषण हा विषय सातत्याने चर्चेत येत आहे. शहरातील हवा इतकी प्रदूषित झाली आहे, की त्यात श्वास घेणेही कठील होत आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा नंबर वरचा लागत आहे. अशा परिस्थितीत येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर एका उद्योगपतीने खूप वेगळं मत मांडलं आहे. प्रदूषणाच्या आधारावर शहरातील प्रॉपर्टीचे दर ठरवावेत, असं मत त्यांनी मांडलं आहे.

झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी देशातील अनेक मोठ्या मेट्रो शहरांमधील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर हे मत मांडलं आहे. निखिल कामथ यांनी अशा शहरांतील हवेच्या गुणवत्तेच्या आधारे मालमत्तेच्या किमती निश्चित करण्याचे सुचवले आहे. शहरी प्रदूषणाचा ज्या गांभीर्याने विचार करायला हवा होता, तो दिसत नाही, असे त्यांचे मत आहे.

नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. त्यासोबत एक पेपर क्लिपिंग देखील शेअर केली आहे. या पेपर क्लिपिंगमध्ये प्रदूषण आणि हवेच्या गुणवत्तेशी संबंधित इतर धोकादायक परिणामांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा डेटा आहे. त्यांच्या मते, हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेच्या आधारावर मालमत्तेच्या किमती ठरवल्या गेल्या तर देशातील तीव्र प्रदूषणाचा सामना करणाऱ्या शहरांमध्ये सुधारणा दिसून येईल. ही कल्पना क्रांतिकारक वाटत असली तरी ती परिणामकारकही ठरू शकते, असे नितीन कामथ यांना वाटते.

नितीन कामथ यांनी लिहिले आहे, की वायू प्रदूषण अधिक गांभीर्याने घेण्यासाठी आणखी काय घडण्याची वाट आपण पाहत आहोत? मृत्यूचा हा आकडा फक्त २०१९ पर्यंतचा डेटा कव्हर करत आहे. ५ वर्षांनंतर म्हणजेच २०२४ पर्यंत परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

हवेच्या गुणवत्तेच्या आधारावर मालमत्तेच्या किमतीत सवलत दिल्यास, ज्या शहरांमध्ये हवा आणि पाण्याची गुणवत्ता चांगली आहे, अशा शहरांमध्ये किमती जास्त असतील. याउलट ज्या शहरांमध्ये हवा विषारी आहे, पाणी अशुद्ध आहे, अशा शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती कमी असतील.

नितीन कामथ यांच्या मते, त्यामागे अर्थशास्त्र असेल तर कदाचित त्यावर तोडगा काढता येईल. मालमत्तेचे दर हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार निर्धारित केले गेले तर मालमत्ता मालक केवळ त्याच्या मालमत्तेसाठीच नाही तर जवळपासच्या संपूर्ण जागेसाठी आणि वातावरणासाठी पैसे देत आहे. यानंतर लोक सतर्क होण्याची शक्यता आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, मला जेपी नगरमध्ये मालमत्ता खरेदी करायची असेल तर संपूर्ण जेपी नगरच्या पर्यावरणाचे मूल्यांकन करुन निर्णय घेतला. तर याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. 

टॅग्स :दिल्ली प्रदूषणप्रदूषणदिल्ली