Join us

भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:31 IST

india and pakistan : भारत पाकिस्तानला निर्यात करत असलेल्या वस्तूंमध्ये सेंद्रिय रसायने, औषधी उत्पादने, खनिजे, साखर आणि मिठाई यांचा समावेश आहे.

india and pakistan : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. मंगळवारी रात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून ९ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. याआधी भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलली. यामध्ये सिंधू पाणी करार रद्द करत वॉटर स्ट्राईक केला. तर अटारी बॉर्डर बंद करुन व्यापारही थांबवला. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापारावर बंदी घातली आहे. आता व्यापाराबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही देश दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या वस्तू एकमेकांना विकतात. भारत पाकिस्तानला खूप निर्यात करतो. दरवर्षी पाकिस्तानला हजारो कोटी रुपयांच्या वस्तू विकल्या जातात.

वास्तविक, आपण पाकिस्तानकडून खूप कमी वस्तू खरेदी करतो. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानकडून वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी केले आहे. परंतु, २०२० च्या तुलनेत २०२४ पर्यंत भारताची पाकिस्तानला होणारी निर्यात ३०० टक्क्यांनी वाढेल.

पाकिस्तान भारताकडून काय खरेदी करतो?भारत पाकिस्तानला निर्यात करत असलेल्या वस्तूंमध्ये सेंद्रिय रसायने, औषधी उत्पादने, खनिजे, साखर आणि मिठाई यांचा समावेश आहे. त्याच वेळी, पाकिस्तान भारताला मीठ, सल्फर, चुना, कपडे आणि सिमेंट निर्यात करतो. भारतात पाकिस्तानी उत्पादनांवर अजूनही २०० टक्के कर आहे. २०२४ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार १.२१ अब्ज डॉलर्स म्हणजेच १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होता.

वाचा - ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

पाकिस्तानी वस्तूंवर २००% टॅरिफभारताने पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के कर लादला आहे. भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून घेतला. यामुळे, पाकिस्तानची भारताला होणारी निर्यात २०१९ मध्ये ५४७ दशलक्ष डॉलर्सवरून २०२४ मध्ये ४८ दशलक्ष डॉलर्सवर घसरली. २०१९ मध्ये, जेव्हा काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आले, तेव्हा पाकिस्तानने भारतासोबतचा सर्व द्विपक्षीय व्यापार थांबवण्याची घोषणा केली होती. पण, जेव्हा पाकिस्तानमध्ये महागाई वाढली तेव्हा त्यांनी हा निर्णय मागे घेतला. 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लासंपटॅरिफ युद्ध