Join us  

'हे' ९,३९५ कोटी रुपये कुणाचे?; पोस्टात जमा असलेल्या रकमेला वारसच नाही    

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 1:08 PM

पोस्ट खात्याच्या विविध योजनांमध्ये सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या जातात. मात्र सद्यस्थितीला भारतातील विविध पोष्टांमध्ये हजारो कोटींच्या ठेवी पडून आहेत

ठळक मुद्देसद्यस्थितीला भारतातील विविध पोस्टांमध्ये सुमारे नऊ हजार 395 कोटी रुपये बेवारस स्थितीत पडूनया ठेवींना कुणीही दावेदार नाहीत सरकारी आकडेवारीनुसार 31 मार्च 2018 रोजी दाव्याविना पडून असलेली एकूण रक्कम ही 15 हजार 166.47 कोटी रुपये एवढी प्रचंड होती

नवी दिल्ली -  आपल्याकडची बचत गुंतवण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये पोस्टखात्याचा पर्याय लोकप्रीय आहे. त्यामुळे पोस्ट खात्याच्या विविध योजनांमध्ये सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या जातात. मात्र सद्यस्थितीला भारतातील विविध पोस्टांमध्ये सुमारे नऊ हजार 395 कोटी रुपये बेवारस स्थितीत पडून आहेत. या ठेवींवर कुणीही दावा केलेला नाही. पोस्टाच्या विविध योजनांमध्ये सर्वसामान्यांकडून छोट्या रकमेची गुंतवणूक होत असते. मात्र बऱ्याचदा कागदपत्रे हरवल्याने अशा रकमेवर दावा केला जात नाही. त्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या ठेवी पोष्टामध्ये पडून राहतात.सध्या पोस्टच्या किसान विकास पत्रामध्ये सुमारे 2 हजार 429 कोटी रुपये पडून आहेत. तर मंथली इन्कम स्कीममध्ये 2 हजार 56 कोटी रुपये पडून आहेत. त्याबरोबरच एनएससीमध्येही 1 हजार 888 कोटी रुपयांच्या ठेवी कुठल्याही दाव्याविना पडून आहेत.  सर्वात मोठी बाब म्हणजे दाव्याविना पोस्टात पडून असलेल्या रकमेपैकी सुमारे अर्धी रक्कम ही पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पोस्टामधील आहे. याआधी एलआयसीमध्ये हजारो कोटींच्या ठेवी दाव्याविना पडून असल्याचे समोर आले होते. सरकारी आकडेवारीनुसार 31 मार्च 2018 रोजी दाव्याविना पडून असलेली एकूण रक्कम ही 15 हजार 166.47 कोटी रुपये एवढी प्रचंड होती. दाव्याविना पडून असलेल्या रकमेममध्ये एलआयसी पहिल्या क्रमांकावर असून, एलआयसीमध्ये सुमारे 10 हजार 509 कोटी रुपयांच्या ठेवींवर कुणीही दावा केलेला नाही. तर खासगी कंपन्यांकडे 4 हजार 657.45 कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत.  

टॅग्स :पोस्ट ऑफिसभारत