इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (Indian Sugar Mills Association-isma) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे १४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उसातील रस कमी होऊन साखर उत्पादनात घट येऊ शकते. यामुळे पुरवठ्यात घट झाल्याने साखरेच्या किमती वाढू शकतात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत देशात २१९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात झालेले उत्पादन २५५ लाख टन इतके होते. म्हणजेच यंदा उत्पादन ३६ लाख टन कमी झाले आहे.उसाचा पुरवठा बंद झाल्याने तब्बल १७७ कारखाने आतापर्यंत बंद झाले. गेल्यावर्षी फेब्रुवारीपर्यंत या कारखान्यांची संख्या ६५ इतकीत होती.
हीट वेव्हमुळे बसेल फटका; रसाची मात्रा कमी होणार
हवामान विभागाने सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. परिणामी उसातील रसाची मात्रा झपाट्याने कमी होऊ शकते. त्यामुळे याचा फटका साखर उत्पादनाला बसू शकतो. कमी उत्पादनाचा परिणाम बाजारात देखील दिसू लागला आहे. आतापर्यंत साखरेच्या किमतीमध्ये ६.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
साखरेचे दर आता ३८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर खूप जास्त आहेत. उत्पादनात घट अशीच सुरू राहिली तर बाजारात साखरेचे दर नवीन विक्रम प्रस्थापित करू शकतात.