Join us

₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:30 IST

Kalpana Saroj Success Story: देशात आणि जगात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि समर्पणाच्या जोरावर समाजाची अनेक बंधनं तोडून आपली स्वप्नं प्रत्यक्षात आणून मोठं नाव कमावलं आहे

Kalpana Saroj Success Story: देशात आणि जगात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि समर्पणाच्या जोरावर समाजाची अनेक बंधनं तोडून आपली स्वप्नं प्रत्यक्षात आणून मोठं नाव कमावलं आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका महिलेची प्रेरणादायी यशोगाथा घेऊन आलो आहोत, ज्यांनी आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक उदाहरण आहे. ही गोष्ट आहे कल्पना सरोज यांची, ज्यांनी एकेकाळी केवळ २ रुपयांच्या मजुरीवर आपले काम सुरू केलं होतं. पण त्याचा हा प्रवास आज २००० कोटींच्या मोठ्या साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे. व्यवसाय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित केलं आहे.

कल्पना सरोज यांची यशोगाथा

कल्पना सरोज यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते आणि आपल्या मुलीनं शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरू झाला. सासरी त्यांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागले. अशा परिस्थितीतही त्यांच्या धाडस आणि आत्मविश्वासांनं त्यांना थांबू दिलं नाही.

१ रुपयांची कँडी आणि ₹७५० कोटींची विक्री, म्हणूनच तर IIM अहमदाबादनं केस स्टडीसाठी केली निवड

₹२ च्या मजुरीवर काम

अनेक ग्रामीण भागातील महिलांची स्थिती खूपच दयनीय आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यानंतर मोठं यश मिळवणं हे धाडसाचं काम आहे. कल्पना सरोज यांनीही असंच काहीसं केलं. कुटुंब आणि समाजाच्या बंधनांना तोडून कल्पना या केवळ १६ व्या वर्षी मुंबईत आल्या आणि दररोज २ रुपयांच्या वेतनावर कापड गिरणीत काम करू लागल्या. या छोट्याशा सुरुवातीमुळे त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. शिवणकाम आणि बुटीकच्या कामात त्यांनी शक्यता पाहिल्या आणि हळूहळू त्यांच्या कमानी ट्यूब्स या व्यवसायाचा पाया रचला. अनेक अडचणींना तोंड देऊनही, त्यांनी हळूहळू त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणानं त्यांचा व्यवसाय पुढे नेला आणि भारतातील सर्वात यशस्वी महिला उद्योजकांमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलं.

कमानी ट्युब्सचा पुनर्जन्म

२००० साली कल्पना सरोज यांची कमानी ट्यूब्स लिमिटेड प्रचंड कर्ज आणि मजुरांच्या समस्येमुळे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आली होती. या काळात कल्पना सरोज यांनी आपला उत्साह कायम ठेवला आणि आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांची रणनीती आणि नेतृत्वानं कंपनीचा पुनर्जन्म झाला. आपल्या कंपनीवरील प्रचंड कर्ज फेडण्यासाठी त्यांनी तत्कालीन अर्थमंत्र्यांची भेट घेऊन अनेक आवश्यक पावलं उचलली. यानंतर त्यांचा व्यवसाय पुन्हा रुळावर आला. आज कमानी ट्यूब्स ही ५०० कोटींहून अधिक उलाढाल असलेली कंपनी आहे. कमानी स्टील्स, केएस क्रिएशन्स आणि कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कल्पना यांच्या इतर कंपन्या आज दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या साम्राज्याचा भाग आहेत.

कल्पना सरोज यांचं मोठं यश

कल्पना सरोज यांचं कर्तृत्व केवळ त्यांच्या वैयक्तिक संघर्षाचं प्रतिबिंब नाही तर महिला सक्षमीकरणाचंही एक उदाहरण आहे.२०१३ मध्ये भारत सरकारनं त्यांना व्यापार आणि उद्योगातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं.

कल्पना सरोज यांची कथा एखाद्या प्रेरणादायी चित्रपटापेक्षा कमी नाही. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज २००० कोटी रुपयांच्या साम्राज्यापर्यंत पोहोचलाय. त्यांचं जीवन केवळ महिला सक्षमीकरणाचं प्रतीक नाही तर दृढ निश्चय आणि मेहनतीनं कोणतेही ध्येय गाठणं अशक्य नाही हे देखील शिकवतं.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय