India Pakistan Tension: पाकिस्तानी सैन्य आपल्या खोट्या दिखाव्यासाठी भारतासोबत लष्करी संघर्ष वाढवत आहे आणि त्याचे परिणाम तेथील जनतेला भोगावे लागत आहेत. विशेष म्हणजे भारतासोबत वाढत्या तणावानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजमधील (पीएसएक्स) उलथापालथ गुरुवारीही सुरूच होती. पाकिस्तानी माध्यम समूह 'द डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी निर्देशांकात काल आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे सुमारे ८२० अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. कराची शेअर बाजारात ७.२ टक्क्यांची घसरण झाल्यानंतर ८ मे रोजी व्यवहार ठप्प झाले होते.
तीन दिवसांत १ अब्ज रुपयांचं नुकसान
पाकिस्तानच्या शेअर बाजारातील प्रचंड घसरणीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजचं मार्केट कॅप केवळ ३ ट्रेडिंग सेशनमध्ये १.३ ट्रिलियन रुपयांनी घसरलंय. वाढता लष्करी तणाव आणि आर्थिक परिस्थितीबाबत वाढती अनिश्चितता यामुळे घाबरलेले गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत. विशेष म्हणजे भारतानं पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आणि आता पुन्हा मोठ्या लष्करी कारवाईनंतर ती अधिक गंभीर होत चालली आहे.
'दशतवाद्यांना मदतीसाठी पैशांचा वापर'
दुसरीकडे, रोख रकमेच्या संकटाशी झगडत असलेल्या पाकिस्तानला ११ हजार कोटींचं आर्थिक पॅकेज देण्यासाठी आयएमएफची महत्त्वाची बैठक अमेरिकेत होणार आहे. यापूर्वी भारतानं पाकिस्तानला हे बेलआऊट पॅकेज देण्यास आक्षेप घेतला होता आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला यावर विचार करण्यास सांगितलं होतं. पाकिस्तान देशाच्या प्रगतीच्या नावाखाली हा पैसा घेतो पण त्याचा वापर दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी करतो, असा भारताचा आरोप आहे.
आयएमएफनं हे बेलआऊट पॅकेज देण्यास नकार दिला किंवा विलंब केला तर तो पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असेल आणि त्याचा वाईट परिणाम शेअर बाजारावरही दिसेल.