BoyCott Pakistan Movement : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. केवळ 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, तर पाकिस्तानची चहूबाजूंनी आर्थिक कोंडी करण्याची मोहीम भारताने हाती घेतली आहे. या अंतर्गत, भारताने सर्वात आधी सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) रद्द केला. त्यानंतर अटारी बॉर्डर (Attari Border) बंद करून दोन्ही देशांमधील आयात आणि निर्यात थांबवली. पाकिस्तानी यूट्युबर्सचे अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत. आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना पाकिस्तानी वस्तू त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) या कंपन्यांना याबाबत नोटीस पाठवली आहे. यापुढे या कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर पाकिस्तानचा ध्वज किंवा इतर कोणतीही पाकिस्तानी वस्तू विकता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानाविरुद्ध बहिष्काराची मोहीम तीव्रसीसीपीए (CCPA) चे म्हणणे आहे की ई-कॉमर्स वेबसाइट्सवर पाकिस्तानी वस्तू आणि त्यांचा ध्वज विकणे हे खुल्या विक्रीसंबंधी कायद्यांचे उल्लंघन आहे. त्यामुळे अशा वस्तू कंपन्यांनी त्वरित आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवाव्यात. ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही याबाबत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे आणि या असंवेदनशील गोष्टी त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना देशाच्या कायद्यांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पाकिस्तानचा मित्र तुर्कस्तानही निशाण्यावरपाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानविरुद्धही भारतात अशीच मोहीम सुरू झाली आहे. भारतीय नागरिक आता तुर्की वस्तूंवर बहिष्कार टाकत आहेत. तेथे प्रवास करणेही टाळत आहेत. इतकेच नव्हे, तर इतर लोकांनाही तुर्कस्तानच्या पर्यटनापासून दूर राहण्याचे आवाहन करत आहेत. विशेष म्हणजे, तुर्कस्तानमध्ये मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक जात असताना, हा बहिष्कार करण्याचे आवाहन केले जात आहे. या कठोर पावलांमुळे पाकिस्तान आणि त्याला साथ देणाऱ्या देशांवर भारताचा दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.