Pakistan Airspace: पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. हे वर्षभर असेच चालू राहिले, तर एअर इंडियाला सुमारे $600 मिलियनचा (सुमारे 5000 कोटी रुपये) तोटा सहन करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, कंपनीने भारत सरकारकडे भरपाईची विनंती केली आहे. एअर इंडियाच्या पत्राचा हवाला देऊन रॉयटर्सने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.
पहलगाम हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने भारताविरोधात अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. यामध्ये सिंधु करार स्थगित करणे, पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करण्यासारखे मोठे निर्णय आहेत. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर म्हणून अनेक पावले उचलली आहेत. यापैकी एक म्हणजे भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करणे. यामुळे, भारतीय विमान कंपन्यांना इंधनावर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे आणि प्रवासाचा वेळही पूर्वीपेक्षा जास्त लागत आहे.
किती नुकसान होईल?रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात कंपनीने म्हटले की, पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केल्याने दरवर्षी 50 अब्ज रुपयांपेक्षा जास्त (591 मिलियन डॉलर्स) नुकसान होईल असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत, एअर इंडियाने या तोट्यानुसार 'सबसिडी मॉडेल'साठी भारत सरकारकडे विनंती केली आहे.
चीनच्या पर्यायी मार्गांवरही चर्चासरकारी अधिकाऱ्यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना भारतीय विमान कंपन्यांवरील हवाई क्षेत्र बंद केल्याने होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करण्याची विनंती केली होती. पाकिस्तानच्या हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे विमान कंपन्यांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी भारत पर्यायी उपाययोजनांचा शोध घेत आहे. रॉयटर्सच्या सूत्रानुसार, भारतीय विमान कंपन्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाशी पर्यायी मार्गांवर चर्चा केली आहे. यात चीनमधील मार्गावरही चर्चा झाली आहे.