Join us  

कांद्याचे दर कमी होणार? सरकार ५ लाख टनांची खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 1:02 PM

काही दिवसापासून कांद्याचे दर वाढले आहेत. हे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

गेल्या काही दिवसापासून कांद्याचे (Onion) दर वाढले आहेत. हे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून बफर स्टॉकद्वारे लाखो टन कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आटोक्यात येऊन ते स्वस्त होतील, सरकार बफर स्टॉकद्वारे शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी करणार आहे. सरकारने नाफेड आणि एनसीसीएफला रब्बी हंगामासाठी कांदा खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यामुळे सर्वसामान्यांना कांदा स्वस्तात मिळू शकतो.

एक-दोन दिवसांत ही खरेदी औपचारिकपणे सुरू होईल, अशी माहिती मिळत आहे. कांद्याच्या (Onion) वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. याची मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती. सरकारने गेल्या आठवड्यात निर्णय घेतला की पुढील आदेश येईपर्यंत बंदी कायम राहील.  

Paytm  देणार GPay आणि PhonePe ला टक्कर, Fastag बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

मागच्या वर्षी नाफेड आणि एनसीसीएफने बफर स्टॉक तयार करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार बाजारात सोडण्यासाठी सुमारे ६.४ लाख टन कांदा खरेदी केला होता. या खरेदीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला. त्या खरेदीत सरासरी १७ रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. आता तो साठा जवळपास संपला आहे. सध्या महाराष्ट्रात सरासरी घाऊक किंमत १४-१५ रुपये प्रतिकिलो आहे.

कृषी मंत्रालयाच्या माहिनुसार, या वर्षी रब्बी हंगामात १९०.५ लाख टन कांद्याचे (Onion) उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या २३७ लाख टनांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे २०% कमी असेल. देशात वर्षभर कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी रब्बी हंगाम अत्यंत महत्त्वाचा आहे. हे वार्षिक उत्पादनाच्या सुमारे ७५% आहे. 

टॅग्स :कांदा