Join us

परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? अर्थमंत्री पहिल्यांदाच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:55 IST

Nirmala Sitharaman : परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारानेगुंतवणूकदारांना रडकुंडीस आणले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या घसरणीला अद्याप ब्रेक लागला नाही. नाही म्हणालाया अधूनमधून बाजारात थोडीफार वाढ होते. मात्र, ती वाढ कधी घसरेल याची शाश्वती नाही. बाजाराच्या घसरणीमागे मुख्य कारण परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FPI) विक्री आहे. एफपीआयने चालू वर्षात शेअर्समधून सुमारे १ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

..म्हणून परकीय गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत : अर्थमंत्री निर्मला सीतारामनपरकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात नफा कमावला आहे. त्यांचा उद्देश साध्य झाल्याने ते बाहेर पडत आहेत. ते म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वातावरणात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. गुंतवणूकदार नफाही बुक करत आहेत. किंबहुना, गेल्या ९ दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री होत आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत सेन्सेक्स-निफ्टी जवळपास १५ टक्क्यांनी घसरला आहे. मुंबईत अर्थमंत्र्यांनी अर्थ मंत्रालयासोबत अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषद घेतली. ज्यात शेअर बाजारातील सततच्या घसरणीबाबत अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

शेअर बाजारातील विक्री अल्पकालीन..अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, की भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूतीमुळे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. सध्या परदेशी गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदार देखील नफा बुक करत आहेत. या प्रश्नाचे उत्तर देताना वित्त सचिव तुहिन कांता दास म्हणाले, परदेशी गुंतवणूकदार एका उदयोन्मुख बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारात जात असल्याचा दावा खोटा आहे. अमेरिकेत गुंतवणूकदार त्यांच्याच देशात परत जात आहेत. जागतिक अनिश्चितता असूनही, सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भविष्यातही अशा उपाययोजना सुरुच राहतील, असंही दास म्हणाले. अर्थ मंत्रालयाच्या इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, जागतिक अनिश्चिततेमुळे बाजारात विक्री झाली असून ती अल्पकालीन आहे.

बाजार भांडवल घसरलेशेअर बाजारात सातत्याने होत असलेल्या विक्रीमुळए बाजार भांडवल १४ महिन्यांत प्रथमच ४ ट्रिलियन डॉलरच्या खाली घसरले आहे. शेअर बाजाराचे मार्केट कॅप ३.९९ ट्रिलियन डॉलरवर आले आहे, जे ४ डिसेंबर २०२३ नंतरचे सर्वात कमी आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप ५.१४ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले होते. म्हणजेच या पातळीपासून मार्केट कॅपमध्ये १ ट्रिलियन डॉलर्सची घसरण झाली आहे. निफ्टी २६००० च्या स्तरावरून २३००० च्या खाली तर सेन्सेक्स ८६००० च्या स्तरावरून ७६००० च्या खाली घसरला आहे. निफ्टीचा मिडकॅप इंडेक्स ६०००० वरून ५०००० च्या खाली आला आहे.

टॅग्स :निर्मला सीतारामनशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक