आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना असंच काही यशस्वी उद्योगपती म्हटलं जात नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात. सुमारे दशकभरापूर्वी त्यांनी जिओ लाँच केलं आणि संपूर्ण जगाला आपण काय करू शकतो हे दाखवून दिलं. सध्या जिओचे ४० कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात जेव्हा जगभरातील शेअर बाजार बुडत होते. त्यांनी जगातील मोठ्या कंपन्यांकडून अब्जावधी डॉलर्सचा निधी गोळा केला होता आणि आपल्या कंपन्यांमधील काही हिस्सा विकून स्वत:ला कर्जमुक्त केलं होतं.
त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दूरदृष्टीचा अप्रतिम नमुना सादर केला आहे. ५०० कोटींच्या छोट्या गुंतवणुकीतून त्यांनी ९,००० कोटी रुपयांचं प्रचंड उत्पन्न कमावलंय. म्हणजेच त्यांनी २२०० टक्के जबरदस्त परतावा मिळवला आहे. पाहूया त्यांनी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक कुठे केली होती, जी त्यांनी ९,००० कोटी रुपये कुठून कमावले.
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
असे कमावले ९ हजार कोटी
मुकेश अंबानी यांनी एशियन पेंट्समधील त्यांचा संपूर्ण हिस्सा विकला आहे. याचा अर्थ असा की ते एशियन पेंट्समधून बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एशियन पेंट्समधून ९००० कोटी रुपये कमावले आहेत. त्यांनी सुमारे १७ वर्षांपूर्वी एशियन पेंट्समध्ये ५०० कोटी रुपये गुंतवले होते. ज्यासाठी त्यांना कोट्यावधी शेअर्स मिळाले. आता त्यांची किंमत ९,०८० कोटी झाली आहे. याचा अर्थ असा की १७ वर्षांत मुकेश अंबानींना एशियन पेंट्सच्या शेअर्समधून २,२०० टक्के इतका जबरदस्त परतावा मिळालाय.
रिलायन्स इंडस्ट्रीजनं (RIL) सोमवारी घोषणा केली की त्यांनी एशियन पेंट्सचे उर्वरित ८७ लाख इक्विटी शेअर्स आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ म्युच्युअल फंडला सरासरी २,२०७.६५ रुपये प्रति शेअर या दराने १,८७६ कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलमध्ये विकले आहेत. गेल्या आठवड्यात, एसबीआय म्युच्युअल फंडला ३.५० कोटी शेअर्स २,२०१ रुपये प्रति शेअर या दराने ७,७०४ कोटी रुपयांना विकले गेले, ज्यामुळे पेंट जायंटमधून आरआयएलची बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
संपूर्ण हिस्सा विकला
आरआयएलने त्यांची उपकंपनी सिद्धांत कमर्शियल्सद्वारे त्यांचा संपूर्ण ४.९ टक्के हिस्सा विकला आहे. कंपनी अनेक आव्हानांना तोंड देत असताना कंपनी एशियन पेंट्समधून बाहेर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत, एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ज्यामुळे कंपनी या काळात सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या ब्लू चिप स्टॉक पैकी एक बनली आहे.