Join us  

बँकांच्या बुडीत कर्जावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 10:40 PM

बँकांच्या बुडीत कर्जाच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार आणि औद्योगिक संघटनांवर निशाणा साधला आहे. फिक्कीच्या मंचावरून संबोधित करताना उद्योगपती आणि याआधीच्या सरकारमध्ये असलेल्या साट्यालोट्यावर टीका केली.

नवी दिल्ली - बँकांच्या बुडीत कर्जाच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार आणि औद्योगिक संघटनांवर निशाणा साधला आहे. फिक्कीच्या मंचावरून संबोधित करताना उद्योगपती आणि याआधीच्या सरकारमध्ये असलेल्या साट्यालोट्यावर टीका केली. "जेव्हा सरकारमधील काही व्यक्तींकडून बँकांवर दबाव आणून काही ठरावीक उद्योगपतींना कर्ज दिले जात होते तेव्हा फिक्कीसारख्या संस्था काय करत होत्या, असा सवालही मोदींनी केला.  फिक्कीच्या 90 व्या महासभेला संबोधित करताना मोदी  म्हणाले,"त्या काळात काही उद्योगपतींना लाखो, कोटींची कर्जे दिली गेली. बँकांवर दबाव आणून पैसे दिले गेले. आधीच्या सरकारच्या धोरणांमुळे बँकींग क्षेत्राच्या झालेल्या दुरवस्थेबाबत फिक्कीने कुठला सर्व्हे केला आहे की नाही, याबाबत मला कल्पना नाही. सध्या एनपीएवरून जो काही ओरडा सुरू आहे तो याआधीच्या सरकारमध्ये बसलेल्या अर्थतज्ज्ञांनी या सरकारवर लादलेले ओझे आहे."बँकींग व्यवस्थेतील गोंधळ आणि एनपीएच्या समस्येवरून याआधीच्या सरकारवर हल्ला करताना मोदी म्हणतात, बँकींग क्षेत्रातील दुरवस्था सुधरण्यासाठी सरकारकडून सातत्याने पावले उचलण्यात येत आहेत. बँकांच्या हिताचे रक्षण करण्यात येईल., तसेच ग्रहकांचेही हीत अबाधित राखले जाईल, तेव्हाच देशाचे हित सुद्धा सुरक्षित होईल.  याआधी भांडवलदार व उद्योजकांच्या कर्जवाटपातील तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांचा एनपीए आतापर्यंत दडवून ठेवण्यात आला होता. मोदी सरकारने नव्याने बँकांना ताळेबंद तयार करण्यास सांगितल्यानंतर तो बाहेर आला. यामुळेच हे सरकार भांडवलदारांना कर्जमाफी देते, ही केवळ कल्पना आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.. या विषयावरून त्यांनी ब्लॉगवरून यूपीए सरकारवर अप्रत्यक्षरीत्या सडकून टीका केली होती.  

टॅग्स :नरेंद्र मोदीभारत