भारतातील कंपन्यांमध्ये काम करणारे कोट्यवधी लोक सध्या अस्वस्थ आहेत. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, जगातील वाढता तणाव, विशेषत: मध्यपूर्वेतील संघर्षाचा थेट परिणाम भारताच्या नोकऱ्यांवर होऊ लागला आहे. जीनियस कन्सल्टंट्सच्या सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की सुमारे ६३% कंपन्यांनी एकतर नोकरभरती थांबवली आहे किंवा कर्मचारी कपात सुरू केली आहे. या बदलाची झलक प्रत्येक ऑफिसमध्ये पाहायला मिळतेय.
इस्रायल-इराण युद्धापूर्वी तणावाचे पडसाद उमटले आहेत. जीनियस कन्सल्टंट्सने १२ मे ते ६ जून या कालावधीत सर्वेक्षणात २,००६ कर्मचाऱ्यांचा समावेश केला आणि त्यातील मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतन, बोनस किंवा पदोन्नतीवर परिणाम झाल्याची कबुली दिली. अनेक कंपन्या आता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांऐवजी कंत्राटी किंवा फ्रीलान्सरवर अधिक अवलंबून आहेत. यामुळे ३६ टक्के कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं असून २२ टक्के कर्मचाऱ्यांना परदेशी एक्सपोजरवर कपात सहन करावी लागलीये.
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
सुरक्षिततेबद्दल भीती
कंपन्यांमधील वातावरणही बदललं आहे, २१% लोकांना असं वाटतं की टीमचं मनोबल कमी झालं आहे आणि नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल भीती देखील वाढली आहे. जीनियस कन्सल्टंट्सचे सीएमडी आरपी यादव म्हणतात की हा केवळ आर्थिक धक्का नाही तर हा एक असा काळ आहे ज्यानं कामाबद्दल आपला विचार करण्याची पद्धत बदलली आहे. आता कर्मचारी केवळ त्यांचं काम करत नाहीत तर नवीन कौशल्यं शिकत आहेत आणि नवीन मार्ग शोधत आहेत. हेच कारण आहे की ५५% लोक आता स्वतःला सुधारण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत.
कर्मचाऱ्यांना भविष्याची चिंता
परिस्थिती इतकी तणावपूर्ण आहे की ५६% कर्मचाऱ्यांनी कबूल केलंय की त्यांना भविष्याची चिंता आहे आणि ३०% कर्मचाऱ्यांना असंही वाटतंय की गोष्टी त्यांच्या नियंत्रणात नाहीत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या कठीण काळात कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी मोकळेपणानं बोललं पाहिजे. त्याच वेळी, कर्मचाऱ्यांनाही बदलासाठी तयार राहावं लागेल. नवीन कौशल्यं शिकणं, स्वतःला अपडेट ठेवणं आणि लवचिकता दाखवणं आता आवश्यक झालंय.