Join us

इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:16 IST

Middle East Conflict : गेल्या दोन वर्षांत भारताने आपली तेल आयात रणनीती खूपच स्मार्ट बनवली आहे. देशाने आता आखाती देशावरील अवलंबित्व खूप कमी केलं आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या अनिश्चिततेच्या काळातही भारताने आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारताने जून महिन्यात रशियाकडून विक्रमी तेल खरेदी केली असून, सौदी अरेबिया आणि इराकसारख्या मध्यपूर्वेतील अनेक मोठ्या तेल उत्पादक देशांना मागे टाकले आहे.

रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, अमेरिकेकडूनही आयात वाढलीकेप्लरच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये भारताने रशियाकडून दररोज २ ते २.२ दशलक्ष बॅरल तेल आयात केले, जे गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. मे महिन्यात हा आकडा दररोज १९.६ लाख बॅरल होता. विशेष म्हणजे, भारताने रशियाकडून इतके तेल खरेदी केले आहे की ते इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत यांसारख्या मध्यपूर्वेतील देशांकडून मिळणाऱ्या एकूण तेलापेक्षाही जास्त आहे. जूनमध्ये भारताने मध्यपूर्वेतून दररोज सुमारे २० लाख बॅरल तेल घेतले, जे मे महिन्यापेक्षा थोडे कमी आहे.

रशियासोबतच भारताने अमेरिकेकडूनही तेल आयात वाढवली आहे. जूनमध्ये अमेरिकेकडून दररोज ४.३९ लाख बॅरल तेल खरेदी केले, जे मे महिन्यातील २.८० लाख बॅरलपेक्षा खूप जास्त आहे. याचा अर्थ, भारताने आपली तेल खरेदी आणखी मजबूत करण्यासाठी रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांवर आपला भरवसा ठेवला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याचा धोका कमीइराण-इस्रायल युद्धामुळे तेल बाजारात तणाव असला तरी, आतापर्यंत तेल पुरवठ्यावर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही. इराणने जगातील २०% तेल आणि एलएनजी वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीला बंद करण्याची धमकी दिली आहे, ज्यावर भारत त्याच्या ४०% तेलासाठी आणि अर्ध्या गॅस आयातीसाठी अवलंबून आहे.

मात्र, केप्लरचे प्रमुख संशोधन विश्लेषक सुमित रिटोलिया यांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार चीन आहे, जो या मार्गातून ४७% तेल आयात करतो. सामुद्रधुनी बंद केल्यास इराणची स्वतःची तेल निर्यात थांबेल आणि सौदी अरेबियासारख्या देशांशी सुधारलेले संबंध बिघडू शकतात.

भारताची स्मार्ट तेल रणनीतीगेल्या दोन वर्षांत भारत सरकारने आपली तेल आयात रणनीती खूपच हुशारीने बदलली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन संकटानंतर भारताने रशियाकडून स्वस्त तेल आयात वाढवली. पूर्वी भारताच्या तेलाच्या फक्त १% तेल रशियामधून येत होते, जे आता ४०-४४% पर्यंत पोहोचले आहे. रशियाचे तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नाही, तर ते इतर सुरक्षित मार्गांनी येते.

वाचा - ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

भारताने आपल्या रिफायनरीजचेही आधुनिकीकरण केले आहे, ज्यामुळे त्या रशिया, अमेरिका आणि इतर देशांमधील विविध प्रकारच्या तेलावर प्रक्रिया करू शकतात. जर होर्मुझच्या सामुद्रधुनीत काही अडथळा निर्माण झाला, तरी भारताला रशियाकडून अधिक तेल मिळू शकते. याशिवाय, भारताकडे ९-१० दिवसांच्या तेलाचा सामरिक साठा (strategic reserves) आहे, जो कोणत्याही कमतरतेला तोंड देऊ शकतो. सुमित रिटोलिया यांच्या मते, भारताची तेल रणनीती आता खूप लवचिक झाली असून, गरज पडल्यास इतर देशांकडूनही तेल आयात करण्याची भारताची क्षमता आहे.

टॅग्स :इराणइस्रायलरशियाखनिज तेल