नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असतानाच या संकटाच्या काळात सरकारने सामान्य करदाते आणि व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तातडीने पाच लाख रुपयांपर्यंतचा कर परतावा देण्याचे आदेश दिले असून, या निर्णयाचा फायदा 14 लाख करदात्यांना होणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने जीएसटी आणि कस्टमच्या करदात्यांचा कर परतावा देण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे 1 लाख व्यावसायिक आणि एमएसएमईला दिलासा मिळणार असून, सरकार एकूण 18 हजार कोटींचा परतावा देणार आहे.प्राप्तिकर परतावा - कर परतावा भरल्यानंतर ई-पडताळणी केली जाते. यानंतर आयकर परतावा मिळण्यास सुमारे 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागतो. बर्याच वेळा परताव्याची रक्कम फक्त 15 दिवसांतच जमा होते. प्राप्तिकर परताव्याच्या ई-पडताळणीनंतरच परतावा प्रक्रिया सुरू होते. प्राप्तिकर परताव्याची स्थिती प्राप्तिकर ई-फाइलिंग पोर्टल आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर पाहायला मिळू शकते. करदात्यांना तेथे त्यांचा पॅन नंबर आणि मूल्यांकन वर्ष भरावं लागतं.
परतावा न मिळण्याचे कारण समजून घ्या- परतावा न मिळाल्यास प्रथम प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन आपलं प्राप्तिकर खातं लॉग इन करा. यानंतर माय अकाउंट्सवर क्लिक करा त्यानंतर परतावा आणि नंतर डिमांड स्थिती दिलेली असेल. त्यानंतर परताव्याशी संबंधित माहिती उघडकीस येईल. यामध्ये परतावा न पाठविण्याविषयी आपल्याला माहिती मिळेल.