RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत ईएमआयचा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आता रेपो दर ५.५० टक्क्यांवर आला आहे. यापूर्वीही रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो दरात (Repo Rate) कपात केली होती. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी तज्ज्ञांनी रेपो दरात कपातीची शक्यता वर्तवली होती. "जागतिक बाजारांमध्ये अनिश्चितता असतानाही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. गुंतवणूकदारांसाठीही भारतीय शेअर बाजारात अनेक संधी आहेत," असं संजय मल्होत्रा म्हणाले.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली. "सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पतधोरण समितीने (एमपीसी) (RBI MPC Meeting) आपला धोरणात्मक दृष्टिकोन 'अॅकमोडेटिव्ह' वरून 'न्यूट्रल' असा बदलला आहे. सध्याच्या परिस्थितीत विकासाला पाठिंबा देण्याची संधी मर्यादित आहे, त्यामुळे हा बदल आवश्यक आहे," असं ते म्हणाले. अन्नधान्याच्या महागाईबाबत, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंच्या किमती कमी होत असल्याने ती नियंत्रणात राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
फेब्रुवारी, एप्रिलमध्येही कपात
याआधी, फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये झालेल्या गेल्या दोन पतधोरण समितीच्या बैठकांमध्ये आरबीआयनं प्रमुख व्याजदर रेपोमध्ये एकूण ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर रेपो दर सहा टक्क्यांवर आला होता. यानंतर या बैठकीतही रेपो दरात कपात केली जाईल अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत होती.
काय म्हणालेले तज्ज्ञ?
यावेळीही रिझर्व्ह बँक रेपो दरात ०.२५ टक्के कपात करू शकते आणि ऑगस्टच्या बैठकीतही हा कल कायम राहण्याची शक्यता आहे, असं मत यापूर्वी तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. तर दुसरीकडे एसबीआयच्या एका संशोधनात जूनच्या आढावा बैठकीतच रिझर्व्ह बँक ०.५० टक्के 'जंबो' कपात करू शकते अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. वाढीचा वेग सुधारला असला तरी, असमान वापर, खाजगी भांडवली खर्च वाढीतील कमी आणि उत्पादन वाढीतील मंदी यासारखी आव्हानं अजूनही आहेत, असल्याचं केयरएज रेटिंग्सनं म्हटलं.
एमपीसीमध्ये आरबीआयचे तीन सदस्य आणि सरकारनं नियुक्त केलेले तीन बाह्य सदस्य असतात. आरबीआय सदस्यांमध्ये गव्हर्नर संजय मल्होत्रा, डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव आणि कार्यकारी संचालक राजीव रंजन आहेत तर बाह्य सदस्यांमध्ये नागेश कुमार, सौगत भट्टाचार्य आणि प्रोफेसर राम सिंह यांचा समावेश आहे.