Join us  

Budget 2019: सोनं-चांदीवर करभार; दागिन्यांचं स्वप्न महाग होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 2:01 PM

सीमाशुल्कात वाढ झाल्याने सोने-चांदीच्या दरात वाढ होणार आहे. सोन्याच्या दरात 800 रुपये तर चांदीच्या दरात 1000 रुपये वाढण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला मात्र या अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा लावणाऱ्या सर्वसामान्यांना मोदी सरकारने झटका दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने-चांदीसाठी लागणाऱ्या सीमाशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीमाशुल्क 10 टक्क्यांवरुन 12.5 टक्के आकारण्यात येणार आहे.

सीमाशुल्कात वाढ झाल्याने सोने-चांदीच्या दरात वाढ होणार आहे. सोन्याच्या दरात 800 रुपये तर चांदीच्या दरात 1000 रुपये वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकारकडून मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोने चांदीसोबत पेट्रोल-डिझेलवर लावलेल्या 1 रुपये अतिरिक्त करामुळे पेट्रोल-डिझेलही महाग झालं आहे. त्याचसोबत मार्बल, व्हिडीओ रेकॉर्डर, ऑटो पार्ट्स, सीसीटीव्ही कॅमेरा यासारख्या गोष्टीही महाग होणार आहेत. 

 

तसेच अर्थसंकल्पात 2022 म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देशातील प्रत्येक कुटुंबाला वीज जोडणी मिळेल, ज्यांना कनेक्शन घेण्याची इच्छा नाही त्यांना यातून वगळलं जाईल. आरोग्यदायी समाजाअंतर्गत आयुष्मान भारत, सुपोषित महिला आणि मुलं तर नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.सरकारी जमिनींवर स्वस्त घरांची योजना लागू करणार. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी 95 लाखं घरं बांधण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेत 1 लाख 2 हजार किमी रस्ते बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

गेल्या पाच वर्षात नव्या भारतासाठी आम्ही काम केलं, देशातील सर्वात शेवटच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. लोकांनी दिलेल्या जनमताच्या आधारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही आमचं ध्येय गाठणार आहे. घर आणि शौचालयांची व्यवस्था करुन महिलांचा सन्मान वाढवला. आज भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर आहे. पाच वर्षांपूर्वी आपण ११व्या क्रमांकावर होतो असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.  

तसेच आर्थिक विकास वाढविण्यावर भर दिला आहे. मेक इन इंडियामुळे विकासाला चालना मिळाली. गेल्या 5 वर्षात अनेक योजना आणल्या. ‘मजबूत देश के लिए, मजबूत नागरिक हेच आमचं लक्ष्य आहे. भारताकडे जगातील तिसर्‍या क्रमांकाचं देशांतर्गत हवाई वाहतुकीचे जाळे आहे. भारताने आता हवाई वाहतुकीच्या फायनान्सिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची वेळ आलेली आहे. भारतामाला, सागरमाला, उडानमुळे शहर आणि ग्रामीण भागातील दरी कमी झाल्याचं सीतारामन यांनी सांगितले. 

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019सोनंअर्थसंकल्प 2019