Join us  

Air India Sale: सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार एअर इंडियाची विक्री; सरकारनं सुरू केली प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 10:47 AM

Air India Sale : सरकारनं एअर इंडियामधील आपला संपूर्ण १०० टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसरकारनं एअर इंडियामधील आपला संपूर्ण १०० टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरूवातीच्या टप्प्यातील बोली प्रक्रिया सुरू करण्यास झाला होता विलंब

सरकारनं राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाच्या (Air India) विक्रीसाठी आर्थिक बोली (Financial Bids) मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण व्यवहार सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोट्यात सुरू असलेल्या या कंपनीच्या विक्रीसाठी सुरुवातीच्या कालावधीतील बोली प्रक्रियेत कंपनीच्या खरेदीसाठी टाटा समुहानंही रस दाखवला होता.प्रारंभिक निविदांचे विश्लेषण केल्यानंतर पात्र निविदांना एअर इंडियाच्या व्हर्च्युअल डेटा रूममध्ये (व्हर्च्युअल डेटा रूम, व्हीडीआर) प्रवेश देण्यात आला. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असं सूत्रांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितलं. हा करार आता आर्थिक बोलीच्या टप्प्यात आला असून सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. सरकारनं एअर इंडियामधील आपला संपूर्ण १०० टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. २००७ मध्ये या कंपनीचं डोमेस्टीक ऑपरेटर इंडियन एअरलाईन्ससोबत विलिनीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर ही कंपनी तोट्यातच आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या विक्री प्रक्रियेला विलंब झाला आणि सरकारनं सुरूवातीच्या टप्प्यातील बोली प्रक्रिया सुरू करण्याची मुदत पाच वेळा वाढवली होती. एअर इंडियाच्या खरेदीसाठी यशस्वीरित्या बोली लावणाऱ्यांना देशातील ४,४०० विमानतळांवर आणि १,८०० आंतरराष्ट्रीय लँडिंग आमि पार्किंग स्लॉटसह परदेशातील ९०० स्लॉटचं नियंत्रण मिळेल. या लिलावात स्वस्त सेवा पुरवणाऱ्या लो कॉस्ट आर्म एअर इंडिया एक्स्प्रेस आणि AISATS चा ५० टक्के हिस्सादेखील सामील आहे.  

टॅग्स :एअर इंडियाविमानतळटाटापैसासरकार