Join us  

Air India ची मालकी मिळताच TATA चं मोठं पाऊल; आता लेटलतीफपणा नाही चालणार, उड्डाण वेळेत होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 7:11 PM

लेटलतीफपणासोबतच एअर इंडियामध्ये आणखी काही अमूलाग्र बदल करण्याचा टाटा ग्रूपनं निर्धार केल्याचं बोललं जात आहे.

Air India Handover: एअर इंडियाची मालकी अखेर टाटा ग्रूपकडे (Air India handover to TATA Group)  सोपविण्यात आली आहे. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एअर इंडियामधील सरकारचा समभाग आता टाटा सन्सची उपकंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड (Tata Group) कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. आता एअर इंडियाची मालकी अधिकृतपणे टाटा कंपनीकडे गेली आहे. 

"एअर इंडियाची मालकी टाटा कंपनीकडे येण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. एअर इंडियाच्या घरवापसीचा आम्हाला खूप आनंद आहे. एअर इंडियाला वर्ल्ड क्लास दर्जाची एअरलाइन्स कंपनी बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे", असं टाटा सन्सनचे चेअरमन एन.चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. 

ANI च्या माहितीनुसार एअर इंडियाची मालकी स्वीकारताच टाटा ग्रूपनं सर्वात आधी एअर इंडियाच्या लेटलतीफपणाला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या विमानांचं उड्डाण निर्धारित वेळेत होईल याची पुरेपूर काळजी घेण्याला टाटा ग्रूप प्राधान्य देणार आहे. 

लेटलतीफपणासोबतच एअर इंडियामध्ये आणखी काही अमूलाग्र बदल करण्याचा टाटा ग्रूपनं निर्धार केल्याचं बोललं जात आहे. यात विमानातील आसन व्यवस्था, केबिन क्रूचा पेहराव देखील बदलला जाण्याची शक्यता आहे. टाटा ग्रूपचा हॉटेल इंडस्ट्रीमध्येही मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या प्रवाशांना उत्तम गुणवत्तेचं जेवण देण्याचा टाटा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. 

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आता एअर इंडियाच्या सर्व विमानांमध्ये रतन टाटा यांची एक ऑडिओ क्लिप देखील प्रवाशांना ऐकवली जाणार आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटा ग्रूपनं एअर इंडियामध्ये १०० टक्के हिस्सेदारीसाठी १८ हजार कोटींचा करार केला. एअर इंडियासाठी ही बोली टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टॅलेस प्रायव्हेड लिमिटेडच्यावतीनं लावण्यात आली होती. 

टॅग्स :एअर इंडियाटाटारतन टाटा