Join us  

चीनला दणका! Made In China उत्पादनांकडे ४३ टक्के भारतीयांची पाठ: रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 5:41 PM

नवरील राग व्यक्त करण्यासाठी तसेच चीनला धडा शिकवण्यासाठी बायकॉट मेड इन चायना मोहीम राबवण्यात आली होती.

नवी दिल्ली: गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्यातील संघर्ष शीगेला गेला. यानंतर झालेल्या झटापटीत भारतीय जवानांना हौतात्म्य आले. अनेक चिनी सैनिक आणि अधिकाऱ्यांचाही मृत्यू या झटापटीत झाला. मात्र, चीनने अद्याप अधिकृतपणे याबाबतची माहिती दिलेली नाही. असे असले, तरी चीनवरील राग व्यक्त करण्यासाठी तसेच चीनला धडा शिकवण्यासाठी बायकॉट मेड इन चायना मोहीम राबवण्यात आली होती. अनेक भारतीयांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यातच एका अहवालानुसार, गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर गेल्या वर्षभरात सुमारे ४३ टक्के भारतीयांना चायनिज उत्पादने खरेदी केलेली नाहीत. (after galwan valley clash 43 percent indians avoided chinese items in last 12 months) 

संघर्षानंतर चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. या संघर्षानंतर भारतीय नागरिकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. अनेक भारतीयांनी चिनी वस्तूंवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर आता सुमारे वर्षभरानंतर यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, ४३ टक्के भारतीयांनी चिनी वस्तु खरेदी केल्या नाहीत, असे यामध्ये म्हटले आहे. 

आता ‘असा’ समजणार खऱ्या आणि खोट्या सोन्यातील फरक; कशी पटवाल शुद्धतेची ओळख?

कमी किंमती आणि पैशांची बचत

एका वर्षात ४३ टक्के भारतीयांनी कोणतीही चिनी वस्तू खरेदी केलेली नाही, अशी माहिती अहवालातून देण्यात आली. गेल्या वर्षभरात ३४ टक्के नागरिकांनी केवळ एक ते दोनच चिनी वस्तू खरेदी केल्या. तर, १४ टक्के नागरिकांनी गेल्या वर्षभरात ३ ते ५ वस्तू खरेदी केल्या आहेत. तसेच ७ टक्के लोकांनी वर्षभरात ५ ते १० चिनी वस्तू खरेदी केल्या आहेत. सर्वेक्षणातील बहुतेक लोकांनी चिनी वस्तूंच्या खरेदीमागे कमी किंमती आणि पैशांची बचतीचे कारण दिले होते. त्यांची संख्या ७० टक्के असल्याचे सांगितले जाते आहे. 

दरम्यान, या सर्वेक्षणात देशातील २८१ जिल्ह्यांतील १८,००० लोकांचा समावेश होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लोकलक्रिल्सनेही असेच सर्वेक्षण केले होते, त्यानुसार ७१ टक्के लोकांनी त्यावेळी चीनमध्ये बनवण्यात आलेले कोणतेही सामान विकत घेतले नव्हते. यापूर्वी, चीनशी झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने सुमारे १०० चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये सर्वांत लोकप्रिय असलेल्या पबजी, हॅलो, टिक टॉक, अली एक्सप्रेससह अनेक अ‍ॅपचा यामध्ये होता. 

टॅग्स :भारत-चीन तणावशी जिनपिंगभारतलडाख