Join us

७० तास काम… नारायण मूर्तींचं पुन्हा वक्तव्य, आता काय म्हणाले Infosys चे सहसंस्थापक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 08:49 IST

Infosys Narayana Murthy : इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा कामाच्या अधिक तासांवर भाष्य केलं आहे. नुकताच त्यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता.

Infosys Narayana Murthy : इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा कामाच्या अधिक तासांवर भाष्य केलं आहे. नुकताच त्यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. बराच काळ तो चर्चेचा विषय राहिला. यावर आता नारायण मूर्ती यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्ही कुणालाही जास्त वेळ काम करण्यास भाग पाडू शकत नाही. पण, प्रत्येकानं स्वत:चा विचार करून गरज समजून घेतली पाहिजे, असं सोमवारी मुंबईत बोलताना मूर्ती म्हणाले. इन्फोसिसमध्ये ४० वर्षे आपण आठवड्यातून ७० तासांपेक्षा जास्त काम केल्याचं त्यांनी सांगितलं. वाद विवाद नव्हे तर स्वत:हून या विषयाचा विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.

एन. आर. नारायण मूर्ती यांनी तरुणांच्या आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या सल्ल्यावरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलं. कोणावरही दबाव आणण्याचा आपला हेतू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. किंबहुना प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले. स्वत:चं उदाहरण देत, इन्फोसिसमध्ये ४० वर्षे आपण आठवड्यातून ७० तासांपेक्षा जास्त काम केलं. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानं तसं केलं पाहिजे, असंही मूर्ती यांनी नमूद केलं.

मूर्तींनी दिलं आपलं उदाहरण

आयएमसी मुंबई येथे किलाचंद स्मृती व्याख्यानानंतर मूर्ती यांना वर्क लाईफ बॅलन्सवर प्रश्न विचारण्यात आला. मी म्हणू शकतो की मी सकाळी ६.३० वाजता ऑफिसला पोहोचायचं आणि रात्री ८.३० वाजता निघायचं, ही वस्तुस्थिती आहे. ते मी केलंय. त्यामुळे 'हे चुकीचे आहे', असं कोणीही म्हणू शकत नाही. गेली ४० वर्षे मी हे काम करत आहे. ही आपली वैयक्तिक कहाणी असून त्यावर वादविवादापेक्षा आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

या विषयावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही, असं मत मूर्ती यांनी व्यक्त केलं. प्रत्येक व्यक्तीने स्वत:चा विचार केला पाहिजे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे हे समजून घेतले पाहिजे. मी दिलेल्या सल्ल्यावर लोकांनी चर्चा किंवा वाद घालण्याची फारशी गरज नाही. त्याऐवजी प्रत्येक व्यक्तीने स्वत:चा विचार करावा, समजून घ्यावा आणि मग आपल्या विचारसरणीच्या आधारे निष्कर्षापर्यंत पोहोचावं. त्यानंतर त्यांना हवा तो निर्णय घेता येईल. आपल्या मेहनतीमुळे समाजाला किती हातभार लागत आहे, याकडे लक्ष देणे गरजेचं आहे, असंही मूर्ती म्हणाले.

समाज बदलावर भर

आपली मेहनत एखाद्या मुलाच्या भविष्याला जोडून पाहिली पाहिजे, असं ते म्हणाले. जर आपल्या मेहनतीमुळे एखाद्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होत असेल तर ती आपल्यासाठी मोठी बाब असेल. आपण समाजात बदल घडवून आणण्यास किती योगदान देत आहोत याच्याशी आपले प्रयत्न आणि मेहनतीला जोडून पाहिलं पाहिजे. विशेष म्हणजे एखाद्या गरीब मुलाच्या दृष्टीकोनातून समजून घेतलं पाहिजे की आपली मेहनत त्या मुलाचं भविष्य उज्ज्वल बनवण्यात मदत करतेय की नाही, असंही ते म्हणाले. 

जर मी कठोर मेहनत केली, समंजसपणे काम केलं, मला जास्त महसूल मिळाला, मी जास्त कर भरला तर ते मूल चांगल्या स्थितीत असेल. म्हणजेच मेहनत आणि कमाईपेक्षा जास्त कर तुम्ही भरू शकाल. यामुळे सरकारला मदत होईल आणि मुलांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. ७० तास काम करणं हा नियम नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा फक्त आपला वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या क्षमतेनुसार आणि परिस्थितीनुसार काम केलं पाहिजे. कामाच्या तासांपेक्षा आपलं काम समाजासाठी किती फायदेशीर आहे, हे पाहिलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :नारायण मूर्तीइन्फोसिस