तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यात समस्या निर्माण झालीये का? काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये काही ठिकाणी पुरेशी रोकड नसल्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. एजीएस ट्रान्जेक्ट टेक्नॉलॉजीजच्या कर्मचाऱ्यांनी एटीएम मशिनमध्ये रोकड टाकण्यास नकार दिल्यानं अडचण निर्माण झाली होती. एटीएम ट्रान्जेक्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. याचा निषेध म्हणून त्यांनी रोख रक्कम देण्यास नकार दिला. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.
AGS Transact ही रवी गोयल यांची कंपनी आहे. कंपनीत त्यांचा ६०.५ टक्के हिस्सा आहे. ही भारतातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे. सुमारे १५ टक्के मार्केट शेअर असलेली ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. मनी कंट्रोलनं या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. बँका या कंपनीला नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून घोषित करू शकतात. असं झाल्यास एजीएस व्यवहार दिवाळखोरीत जाण्याचा धोका वाढेल.
वर्षभरापासून कॅशची समस्या
एजीएस ट्रान्जेक्टच्या ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, कंपनीला जवळपास वर्षभरापासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोयल यांचे दहा टक्के शेअर्स आधीच बँकांकडे तारण ठेवण्यात आलेत. "एटीएममध्ये पुरेसे पैसे नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी येतात. आम्ही त्याची तपासणी केली असता या एटीएममध्ये पैसे भरले जात नसल्याचं निदर्शनास आलं. नंतर आम्हाला आढळले की ही समस्या मुख्यत: एटीएमची होती ज्यात पैसे टाकण्याची जबाबदारी एटीएसची आहे," असं बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
१००० ते १५०० कोटींची रोकड धोक्यात
या क्षेत्रातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार एटीएममध्ये पैसे भरले जात नसल्यानं सुमारे १००० ते १५०० कोटी रुपयांच्या कॅश इन्वेंट्रीचा धोका वाढू शकतो. दुसऱ्या एका खासगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, डिसेंबरमध्ये डिफॉल्ट वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतरच बँकांनी आरबीआयला याबाबत सांगण्यास सुरुवात केली. सेवेशी संबंधित कोणत्याही समस्येची माहिती बँकांनी आरबीआयला देणं आवश्यक आहे.
अनेक दिग्गज बँक कंपनीचे ग्राहक
क्रिसिल रेटिंग्जच्या रिपोर्टनुसार, एजीएस ट्रान्जॅक्टकडे गेल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत सुमारे ३,८०० एटीएम आणि कॅश रिसायकलिंग मशीनचे (सीआरएम) जाळं होतं. कंपनीचा कॅश मॅनेजमेंट व्यवसाय त्याची उपकंपनी सिक्युअरव्हॅल्यू इंडिया लिमिटेडकडे आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये अनेक दिग्गज बँकांचा समावेश आहे. त्यामध्ये आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
रोख रक्कम देणं बंद केलं
आरबीआयला याबाबत माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी या समस्येची माहिती नियामकाला देणं महत्वाचं होतं कारण आम्ही इतर सेवा प्रदात्यांना नियुक्त करू शकत नाही. त्यासाठी रिझर्व्ह बँकेला कारणं द्यावी लागतील. सध्या बहुतांश बँकांनी एजीएस ट्रान्जॅक्टला रोख रक्कम देणं बंद केलंय, अशी माहिती एका मोठ्या बँकेच्या अधिकाऱ्यानं दिली.