Affordable Housing Market : दिवसेंदिवस घरांच्या कितमी सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. काही शहरांमध्ये तर घर फक्त स्वप्नातच घेऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यावर्षी रेपो दरात १.०० टक्क्यांची कपात केल्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो दर कमी झाल्यामुळे गृहकर्जाचे दरही १ टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत. यामुळे लोकांना आता कर्जावरील व्याज कमी द्यावे लागत असून त्यांचा मासिक हप्ता कमी झाला आहे.
नाईट फ्रँक इंडियाच्या एका ताज्या अहवालानुसार, रेपो दर कमी झाल्यामुळे २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत भारतातील ८ पैकी ७ प्रमुख शहरांमध्ये घर घेणे अधिक ‘परवडणारे’ झाले आहे. या अहवालानुसार, गुजरातचे अहमदाबाद शहर हे देशातील सर्वात परवडणाऱ्या घरांचे बाजारपेठ बनले आहे.
घर घेणे परवडणारे आहे की नाही, हे कसे ठरवतात?एखाद्या शहरात घर घेणे परवडणारे आहे की नाही, हे ठरवण्यासाठी ‘EMI/उत्पन्न गुणोत्तर’ (EMI/Income Ratio) ही पद्धत वापरली जाते. या गुणोत्तरावरून हे कळते की एखाद्या कुटुंबाला त्यांच्या मासिक उत्पन्नापैकी किती टक्के रक्कम घराच्या EMI साठी बाजूला ठेवावी लागते.
उदाहरणार्थ, जर हे गुणोत्तर ४०% असेल, तर त्या शहरातील कुटुंबाला त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या ४०% रक्कम EMI साठी द्यावी लागते. अहवालानुसार, ५०% पेक्षा जास्त गुणोत्तर असेल, तर ते घर परवडणारे मानले जात नाही.
मुंबई सर्वात महाग, अहमदाबाद सर्वात स्वस्तEMI/उत्पन्न गुणोत्तराच्या आधारे देशातील ८ प्रमुख शहरांची स्थिती खालीलप्रमाणे आहे.
- अहमदाबाद : या बाबतीत अहमदाबाद देशातील सर्वात स्वस्त शहर आहे. त्याचे EMI/उत्पन्न गुणोत्तर फक्त १८% आहे. याचा अर्थ, अहमदाबादमधील लोकांना त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या फक्त १८% रक्कम घराच्या हप्त्यासाठी खर्च करावी लागते.
- मुंबई : देशातील सर्वात महागडे घरबाजार अजूनही मुंबई आहे. मुंबईचे EMI/उत्पन्न गुणोत्तर सर्वाधिक ४८% आहे, म्हणजेच येथे घर घेण्यासाठी उत्पन्नाचा जवळपास अर्धा भाग EMI मध्ये जातो.
- इतर प्रमुख शहरे: याशिवाय, पुण्यात हे प्रमाण २२%, कोलकात्यात २३%, दिल्ली-एनसीआरमध्ये २८% आणि हैदराबादमध्ये ३०% आहे.
वाचा - 'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
एकूणच, गृहकर्ज स्वस्त झाल्यामुळे घरांच्या किमती काही प्रमाणात आवाक्यात आल्या आहेत आणि याचा फायदा सामान्य लोकांना होत आहे. पण आजही मुंबईत घर घेणे हे सामान्य माणसासाठी मोठे आव्हान आहे.