Join us

Maharashtra Weather Updates : 'महाराष्ट्रात आठवडाभर गारपिटीसह अवकाळीची शक्यता' 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 8:45 PM

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यतेची तीव्रता अधिक जाणवते. 

मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार दि.१६ मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी (गडगडाटीसह वीजा, वारा, गारा व धारा सह) पावसाची शक्यता जाणवते असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.                       विशेषतः महाराष्ट्रातील वरील २९ जिल्ह्यात रविवार १२ मे पासून त्यापुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार १६ मे पर्यंत मध्यम अवकाळी पावसासोबत विशेष गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातही वरील पाच दिवसात  विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यतेची तीव्रता अधिक जाणवते. 

मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर म्हणजे गुरुवार १६ मे पर्यंत तेथे सरासरी इतके म्हणजे ३५ व २५ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे कमाल व किमान तापमाने राहणार असून तेथे उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस इत्यादी सारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नसून केवळ स्वच्छ उन्हाळी वातावरण जाणवेल, असे वाटते. 

एकंदरीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट जाणवणार नाही. शिवाय ढगाळ वातावरण व काहीशा वारा वहनातून  २९ जिल्ह्यांत दुपारी ३ चे कमाल तापमान  ४० ते ४३ डिग्री से. ग्रेड दरम्यान म्हणजे सरासरी इतके किंवा क्वचितच एक ते दोन डिग्री से. ग्रेडने अधिक जाणवेल. त्यामुळे उन्हाचा विशेष चटका जाणवणार नाही. तसेच मतदारांनी विशेषतः सकाळ व दुपारच्या प्रहरात म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान उरकल्यास त्यांना अवकाळी वातावरणाचा कोणताही विशेष अडथळाही जाणवणार नाही, असे वाटते.

- माणिकराव खुळे  Meteorologist (Retd.) IMD Pune.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान