Join us

पुढील पाच दिवस देशभरातील वातावरण कसं असेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 7:21 PM

मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरातील वातावरणात बदल होऊन थंडीचे जोरदार कमबॅक झाल्याचे चित्र आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरातील वातावरणात बदल होऊन थंडीचे जोरदार कमबॅक झाल्याचे चित्र आहे. त्यानुसार देशभरातील महत्वाच्या राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार दक्षिण भारतातील केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश, कर्नाटक  तसेच पोंडिचेरी काराईकल मधील जवळपास गेले 75 ते 80 दिवसापासूनपासून सुरु असलेला ईशान्य मान्सूनचा जोर संक्रांती दरम्यान ओसरून, तेथील हिवाळी पावसाचा हंगाम या वर्षी 14  जानेवारीला आटोपला आहे. तसा हा मान्सून डिसेंबरमधेच निघून जावयास हवा. पण या वर्षी उशीर होत आहे. तेथील मान्सून बाहेर पडला रे पडला कि महाराष्ट्रातही थंडीसाठी पूरकता वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.                        जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार 14 जानेवारीला ईशान्य मान्सूनच्या निर्गमनातून, विषववृत्त समांतर पूर्वेकडून येणारा हंगामी 'पुरवी' वारा झोताचा प्रभावही त्यामुळे कमी होईल. आणि विषववृत्त दरम्यानचा पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाब असलेले 'आंतर-कटिबंधीय अभिसरणीय परीक्षेत्र '(इंटर ट्रॉपिकल कॉनवर्जिंग झोन) विषववृत्तवरील (शून्य डिग्री अक्षवृत्त) त्याच्या सरासरी जागेपासून काहीसा दक्षिणेकडे म्हणजे 10 डिग्री दक्षिण अक्षवृत्त (दक्षिण गोलार्धात)पर्यन्त सरकेल. त्यामुळे महाराष्ट्रतही हवेच्या उच्चं दाबाच्या टेकड्यांना छेदून जाणारी काल्पनिक उंचावरील रेषा म्हणजे पोळ (रिज) ही दक्षिणे भारताकडेकडे सरकेल.                     सरकलेल्या 'पोळ'(रिज) मुळेच उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना हवेच्या उच्चं दाबरुपी काल्पनिक भिंतीचा अडथळा दूर होवून महाराष्ट्रात काहींसी थंडी  वाढत आहे. येथे ' काहीसीच थंडीचा ' उल्लेख केला, कारण सध्याच्या अस्तित्वातील चालु ' एल-निनो' च्या प्रभावामुळे, एकापाठोपाठ पास होणारे प. झंजावात हे कमी तीव्रतेनेच पास होत आहे. त्यांच्या कमकुवतपणा तसेच दक्षिण अक्षवृत्तकडे म्हणजे देशात ज. काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडकडे घुसणारे 'सैबेरिअन अतिथंड हवेचे लोटा 'अभावी काश्मीरमध्ये सध्या चालु असलेला '40 दिवसा (21  डिसेंबर ते 31 जानेवारी) चा' चालाई कलान ' च्या उच्चं थंडी व बर्फ पडणाऱ्या हंगामी कालावधीही बर्फबारी विना कोरडा जातांना जाणवत आहे. एकूणच उत्तर भारतातही सध्या थंडीची तीव्रता कमीच आहे म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल, असे वाटते.                   निसर्ग कालक्रमणाप्रमाणे २२ डिसेंबर या  दिवशी पृथ्वीचे दक्षिण टोकाकडील साडे तेवीस दक्षिण अक्षवृत्ताचा म्हणजे पृथ्वीचा मकर वृत्तचा जास्तीत जास्त भाग हा सूर्यासमोर असतो आणि दक्षिण गोलार्धातील टोकाकडचा हा भाग 15 जानेवारी पर्यन्तचा (22 डिसेंबर ते 15 जानेवारी) 25 दिवसाचा संक्रमण कालावधीत  मकर वृत्तावरच म्हणजे साडेतेवीस द. अक्षवृत्तवरच जाणवतो. या महिन्याभराच्या कालावधीला कालावधीला 'झुंझूरमास' (धनुर्मास ) किंवा धुंधुर्मास किंवा शून्यमास ही म्हणतात. म्हणूनच थंडीपोषक असा शाकाहारी खाद्याचा खानपानात समावेश करूनही वेगळ्या पद्धतीने हा कालावधी साजरा केला जातो.

म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते.. सूर्याचा धनु राशीत प्रवेश होतो म्हणून झुंझूरमास' बरोबर धनुर्मास ही म्हणतात. मात्र संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. म्हणून तर ह्या संक्रांतीला मकर संक्रांती संबोधले जाते. पंजाब हरियाणा दिल्ली चंदीगड राज्ये त्यामानाने समुद्रसपाटीपासून त्यामानाने कमी उंचीवर तसेच सखल मैदानी भाग संरचनेमुळे येथील थंडी वाढत असते. तेथे संक्रांतीनंतर तेथील जीवन थंडी कमी झाल्यामुळे दैनंदिन जीवन सुसह्य होते. हा आनंद 'लोहोरी' उत्सव म्हणून साजरा करतात. 'शेकोटी'  किंवा 'आगटी'  पेटवून कि ज्याला त्यांच्याकडे ' लोहोरी ' म्हणतात, त्या भोंवती एकत्र येऊन स्रिया -पुरुष नृत्य सादर करतात. तीळ, गूळ, नैवाद्य अग्नीला अर्पण करतात. बाधित होणाऱ्या थंडी पासून सुटका व आल्हाददायक, लाभदायी अश्या थंडीला सुरवात होते म्हणून हर्षउत्सवात अश्या थंडीचे स्वागत म्हणून ' लोहोरी ' साजरी करतात. 

थंडी वाढण्याचे कारण काय? 

मकर संक्रांतीनंतर पृथ्वीचा दक्षिण गोलार्धातील भाग हळूहळू सूर्यापासून दूर तर विषववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातील भाग पुन्हा  सूर्यासमोर अधिक येणे म्हणजेच पृथ्वीचे उत्तरायण चालु होते. आता ह्या सततच्या नेहमीच्या कालचक्रानुसार वर स्पष्ट केल्याप्रमाणे, निसर्गनिर्मित घडामोडी बरोबरच, उत्तर ध्रुवावरील बर्फाळ, आर्टिक्ट, अतिथंड हवेचे उच्चं दाब अक्षवृत्त वर्तुळीय पट्टाही त्यामुळे दक्षिणेकडे म्हणजे रशियन अक्षवृत्तकडे सरकत असतो. त्यामुळे जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा राजस्थानकडे तेथील थंड हवाही भारताकडे लोटली जाते. परिणामी आपल्याकडे ज. काश्मीरमध्ये अतिथंडी व बर्फ पडते. पश्चिम झंजावातबरोबरच ह्या सैबेरिअन चिलच्या थंडी स्थलांतरामुळे अर्ध भारतात उत्तररेकडे थंडी वाढण्याचे हेही एक प्रमुख कारण असते. 

कुठे धुके तर कुठे थंडीची लाट 

म्हणून तर पंजाब, हरियाणा, राजस्थान राज्याच्या काही भागात सध्या सकाळच्या वेळी धुक्याची चादर तर काही भागात अति नव्हे पण थंडीची लाट जाणवत आहे. सध्या आज ह्या भागात पहाटेचे किमान तापमान 2  ते 5 डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. पहाटेचे हे किमान तापमान सरासरीपेक्षा 1 ते 4 डिग्रीने तेथे कमी आहे. ह्याच पंजाब, हरियाणा, राजस्थान भागात समुद्रसपाटी पासून साडे बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी 250 ते 280 किमी असे वेगवान प्रवाही झोताचे ' पश्चिमी' वारे पूर्वेकडे वाहत आहे. साहजिकच त्या खालील पातळीत असलेली थंडी दाबली गेल्यामुळे उत्तर भारतातील थंडी टिकून आहे. उत्तरेकडून ही थंड वारे महाराष्ट्रात घुसतात. म्हणून तर संक्रांती दरम्यान व नंतर आठवडाभर चांगल्या थंडीची अपेक्षा करू या! पंजाब हरियाणा राज्यात सकाळी, संध्याकाळी धुक्याच्या दाट चादरीत लपेटलेले आहे. त्यामुळे दृश्यमानता 25 ते 50  मीटरवर येऊन ठेपली आहे. तर पुढील ५ दिवसात काही भागात ' भू-स्फटी करणाचीही,' शक्यताही नाकारता येत नाही. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :हवामानविधानसभा हिवाळी अधिवेशनभारत