चाळीसगाव : राज्यात सद्यस्थितीत पावसाचे (Unseasonal rain) धूमशान सुरू असून काही धरणांच्या जलपातळीतही वाढ झाली आहे. मात्र, अवकाळी पावसाचा कोणताही बूस्टर गिरणा धरणाला मिळाला नाही. धरणात गुरुवारअखेर केवळ २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
धरणातून पेयजलासाठी वर्षभरात देण्यात येणारी सर्व चारही आवर्तने दिली गेली आहेत. पुढे मागणी झाली तरच आवर्तन सोडण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल, असे गिरणा पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. गिरणा धरणातून (Girana Dam) निम्म्या जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो.
गेल्या वर्षी ३० ऑगस्टला गिरणा धरण (Girana Dharan) ओव्हरफ्लो झाले होते. पर्जन्यमानाची एक्स्प्रेस धिम्या गतीने धावल्याने हा महाकाय प्रकल्प काहीसा उशिरा ओव्हरफ्लो झाला होता. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणानंतर मोठा जलप्रकल्प म्हणून गिरणा धरणाचा उल्लेख होतो.
गत ५५ वर्षात १४वेळा धरणाने शंभरी गाठली आहे. २०२३ मध्ये धरण कसेबसे ५६ टक्के भरले होते. धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू असून मृतसाठा ३ हजार दलघफू इतका आहे.
पेयजलासाठी चार तर सिंचनासाठी तीन आवर्तनेगिरणा धरण ओव्हरफ्लो झाल्यास सिंचनासाठी तीन तर पेयजलासाठी चार आवर्तने दिली जातात. २०२३ मध्ये धरणात केवळ ५६ टक्केच जलसाठा झाल्याने सिंचनासाठी एकही आवर्तन दिले गेले नाही. यामुळे हजारो हेक्टर शेती क्षेत्राला मोठा फटका बसला होता.
गेल्यावर्षी मात्र परतीच्या पावसाने भरभरून माप दिल्याने धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने दिली गेली. याचा थेट फायदा गिरणाखोऱ्यातील बागायती क्षेत्रालाही झाला. गेल्यावर्षी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पेयजलासाठी चार आवर्तने देण्यात आली आहे. चौथे आणि शेवटचे आवर्तन १६ रोजी सोडले गेले.
जिल्ह्यातील ७५ टक्के लोकसंख्येची भागते तहानगिरणा धरणातून चाळीसगावसह मालेगाव शहर, नांदगाव व ५६ खेडी यासोबतच १२७ पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडले जाते. चाळीसगाव व मालेगाव औद्योगिक वसाहतीची चाकेही गिरणा धरणाच्या पाण्यावरच फिरतात. जिल्ह्याच्या ७५ टक्के लोकसंख्येची तहानही गिरणा धरणच भागवते. पेयजलासाठी गिरणा धरणाचे पाणी दहिगाव बंधाऱ्यापर्यंत प्रवास करते.