Join us

Jayakwadi Dam: मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ, मार्चमध्येच जायकवाडी धरण २१.९७ टक्क्यांवर

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 28, 2024 10:59 AM

वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे.

मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचापाणीसाठा वेगाने कमी होत आहे. मार्चमध्ये तो आता केवळ २१.९७ टक्के पाणी शिल्लक राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.

वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. याशिवाय शेती व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी उपसले जाणारे पाणी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा अशा वेगवेगळ्या कारणांनी पाणी वापरले जात आहे.

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आता टँकर सुरु झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीचा खंड आठवड्यावर जाऊन पोहोचला आहे. वेगवेगळ्या जलाशयांमधून उपसल्या जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.

दरम्यान जायकवाडी धरणात आज सकाळी ८.११ वाजता १६.८ टीएमसी पाणी शिल्लक होते. मागील वर्षी याच दरम्यान हा पाणीसाठा ५२ . ३६ टक्के होता. तो आता २१.९७ टक्के एवढा आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांना पाण्याची वाट पहावी लागत आहे.

औष्णीक विद्यूतसाठीही पाण्याचा विसर्ग

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातून परळीच्या औष्णिक विद्यूत प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे.नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे पाणी, शेती तसेच औद्योगीक तसेच महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल ४०० गावांची तहान जायकवाडी धरण भागवते. तसेच परळीतील वीजनिर्मिती थर्मल प्रकल्पसुध्दा याच पाण्यावर अवलंबून आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीपाणीकपातपाणी टंचाई