Join us

हवामानातील टोकाच्या बदलांमुळे जगभरातील ४३.१ दशलक्ष मुलांवर विस्थापनाची वेळ

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 08, 2023 6:00 PM

९५% मुलांचे पूर आणि वादळामुळे विस्थापन 

हवामानातील टाेकाच्या बदलांमुळे जगभरातील ४३.१ दशलक्ष मुलांचे विस्थापनाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युनिसेफच्या एका अहवालातून ही बाब समोर आली असून केवळ पूर आणि वादळामुळे यातील ९५ % मुलांचे विस्थापन झाले आहे असे हा अहवाल सांगतो.

दुष्काळात जंगलात लागणारी आग, अतिपावसाने आलेला पूर असे टोकाचे हवामान बदल आपल्या आजूबाजूला घडत आहेत. या बदलांचा परिणाम मुलांच्या विस्थापनावर होत असल्याचे युनिसेफच्या अहवालातून नुकतेच समोर आले आहे. हवामान बदलांमुळे वाढलेल्या तापमानाशी संबंधित घटना व पूरामुळे झालेल्या उद्धवस्थतेमुळे लाखो मुलांना त्यांच्या घरातून बाहेर पडावे लागत आहे. हवामान बदलांची आणि मुलांच्या विस्थापनाची गुंतागुंत वाढती आहे.

नुकतेच सिक्कीममध्ये आलेल्या पूरात २० हून अधिक जवान बेपत्ता झाले. नागपूरमध्ये पावसाने मोठे नुकसान केले. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पूर आल्याने शहरात आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली. ही मागील महिन्यात हवामानाच्या टोकाच्या बदलांची उदहरणे आहेत.जगात गेल्या सहा महिन्यातील हवामान बदलांमध्ये केवळ पूर आणि वादळामुळे जगभरात ४३.१ दशलक्ष मूलांपैकी ९५ टक्के मुलांना त्यांचे घर सोडून जावे लागले. असे युनिसेफने एका अहवालात स्पष्ट केले.

‘बदलते हवामान आणि विस्थापित मुले यांच्या भविष्याची तयारी’ या विषयावर असणारा हा अहवाल सामान्य हवामान संबंधित धोक्यांमुळे होणाऱ्या मुलांच्या भविष्यावर,अस्तित्वावर होणाऱ्या प्रश्नांचे विश्लेषण करतो. या अहवालात असे नमूद केले आहे की, सहा वर्षांच्या कालावधीत हवामान संबंधित आपत्तींशी संबंधित झालेले मुलांचे विस्थापन ४३.१ दशलक्ष एवढे होते. जवळजवळ ९५ टक्के म्हणजेच नोंदवलेल्या सर्व मुलांचे विस्थापन पूर आणि वादळामुळे झाल्याचे यात निदर्शनास आले. 

विस्थापन- मग ते छोट्या कालावधीसाठी असो वा कायमचे असो, हवामान बदलांमुळे होणाऱ्या या विस्थापनांची गुंतागुंत मोठी आहे. हे विस्थापन त्या कुटुंबासाठी किंबहूना त्या मुलासाठी किती जोखमीची ठरू शकते याचा विचारही अंगावर काटा आणणारा. मुळातच शिक्षणाची समास्या असताना नव्याने निवारा शोधण्याची वेळ आलेल्या या मुलांवर शोषण,आणि अत्याचारांचे धोकेही वाढतात. आपत्तीनंतर विस्थापन पर्यायाने पालकांपासून, नातेवाईकांपासून दूर होण्याची वेळ या मुलावर येते. लहान मुलांची तत्करी, वाढते अत्याचाराचे धोके, शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या प्रवेशात व्यत्यय येऊ शकतो. मुलांना कुपोषण, रोग आणि अपूरे लसीकरण यांचा सामना करावा लागतो.

हवामानाशी संबंधित घटनांमध्ये प्रत्यक्षात विस्थापित झालेल्या मुलांची संख्या हा खूप अधिक असू शकतो. कोणत्या कोणत्या आपत्तींमुळे मुलांना विस्थापन करावे लागले? आपत्तीच्या काळात विस्थापन झालेल्या बहुतांश देशांमध्ये भारतही आहे.

पूर

2016 ते 2021 पर्यंत किनारपट्टीवरील पूर आणि अचानक आलेल्या पूरांसह पूरांमुळे सर्वाधिक मुलांचे विस्थापन झालेले 10 देश हे होते:

बांगलादेश, चीन, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, फिलीपिन्स, सोमालिया, दक्षिण सुदान आणि सुदान.

वादळे

2016 ते 2021 पर्यंत उष्णकटिबंधीय वादळे, तुफानी वादळे, हिमवादळे आणि वाळूच्या वादळांसह वादळांमुळे सर्वाधिक मुलांचे विस्थापन झालेले 10 देश होते:

बांगलादेश, चीन, क्युबा, होंडुरास, भारत, मादागास्कर, मोझांबिक, फिलीपिन्स, युनायटेड स्टेट्स आणि व्हिएतनाम

दुष्काळ

दुष्काळ हा इतर धोक्यांपेक्षा वेगळा असतो कारण तो हळूहळू विकसित होतो.काहीवेळा अगदी वर्षानुवर्षे त्याचे परिणाम दिसतात आणि त्यांची सुरुवात ओळखणे सामान्यतः कठीण असते. 2017 ते 2021 पर्यंत दुष्काळामुळे सर्वाधिक मुलांचे विस्थापन झालेले 10 देश हे होते:

अफगाणिस्तान, अंगोला, ब्राझील, बुरुंडी, इथिओपिया, भारत, इराक, मादागास्कर, सोमालिया आणि दक्षिण सुदान.

जंगलातील आग

वीज पडून किंवा मानवी कृतींमुळे जंगलातील आग भडकू शकते. 2016 ते 2021 या कालावधीत जंगलातील आगीमुळे सर्वाधिक मुलांचे विस्थापन झालेले 10 देश हे होते:

ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रान्स, ग्रीस, इस्रायल, स्पेन, सीरिया, तुर्की आणि युनायटेड स्टेट्स.

 

टॅग्स :हवामानदुष्काळपूरपाऊसस्थलांतरण