Join us

भावाच्या सल्लाने राजेंद्र करताहेत शेती; मिश्र फळबागेतून उत्पन्नाची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 9:52 PM

मिश्र फळबाग शेतकऱ्यांच्या फायद्याची असून कमी खर्चात दुहेरी फायदा देणारी असल्याचे राजेंद्र सांगतात.

रविंद्र शिऊरकर 

योग्य व्यवस्थापन आणि नियोजनाच्या आधारे वडीलोपार्जित फळबागेला आधुनिक व फायद्यात रूपांतरित करत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी राजेंद्र सध्या आंबा व लिंबू अशा मिश्र फळबागेतून चांगले उत्पन्न घेत आहे. 

जेऊर कुंभारी (ता. कोपरगाव) येथील राजेंद्र केशवराव गिरमे व बंधु किशोर यांना एकत्रित नांदूर मध्यमेश्वर उजव्या कालव्याच्या कडेला एकूण  १६ एकर शेती. किशोर हे कृषीपदवीधर व व्यवसायामुळे पुणे ला स्थायिक असल्याने शेतीची पूर्ण जबाबदारी ही राजेंद्र व त्यांच्या पत्नी पूर्वा राजेंद्र यांच्याकडे आहे. राजेंद्र हे गावचे माजी सरपंच, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा संचालक.

घरीची एकूण १६ एकर शेती ज्यात वडिलांनी उभारलेली पेरुची अडीच एकर फळबाग तर उर्वरित शेतात ऊस, कांदा, भुसार असे पारंपरिक पिके ते घेत.  मात्र पेरुचे अधिक कालावधीचे झाडे असल्याने त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. यावर तोडगा काढत राजेंद्र यांनी बंधु किशोर यांच्या मार्गदर्शनाने जून २०११ मध्ये ३३ फुट बाय ३३ अंतरावर राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या केशर आंब्याची लागवड केली. मात्र लागवडी नंतर सात वर्षानी फळे हातात येणार तोपर्यंत होणारा खर्च कसा मिळवायचा यातून आंतरपीक घेण्याचे ठरले. ज्यातून मिश्रबाग हा मार्ग त्यांनी निवडला. ज्यात १६.६ फुटावर कागदी लिंबूची लागवड केली.

सध्या लिंबू आणि आंबा असे दुहेरी उत्पन्न राजेंद्र हे घेत आहे. अलीकडे पीक पद्धतीत झालेल्या बदलांना तसेच वातावरणीय समस्यांना सामोरे जात असतांना मिश्र फळबाग अधिक फायद्याची असून इतर पिकांच्या तुलनेत कमी कष्टात समतोल राखणारी आहे. तर काही वेळेस अधिकचे उत्पन्न देणारी मिश्र फळबाग असल्याचे राजेंद्र सांगतात.   

व्यवस्थापन, खर्च व उत्पन्न 

वार्षिक एकदा प्रती झाड सरासरी २५ किलो शेणखत दिले जाते. तसेच परिस्थितीनुसार विविध औषधी फवारणी केल्या जातात. ज्यात फळमाशी नियंत्रण मुख्य असून इतर माशींसाठी चिकट सापळे लावण्यात आलेले आहे. बागेतील तणनियंत्रणासाठी वेळोवेळी विविध तणनाशकांची फवारणी केली जाते. 

शेणखत, मजुरी, खते, तोडणी, असा सर्व वार्षिक खर्च अडीच एकर करिता सरासरी २ लाख रूपयांचा वार्षिक होतो. तर लिंबू व आंबा दोन्हीही विक्री राजेंद्र हे स्वतः बाजारात पोहच करून करतात. त्यातून वार्षिक सरासरी ८ लाखांचे उत्पन्न होते.     

सौ पूर्वा यांनी केले लिंबू मूल्यवर्धन

उन्हाळा वगळता इतर हंगामात लिंबू ला अधिकची मागणी नसते. तसेच बाजारदर ही कोसळलेले असतात. अशा वेळी लिंबू वर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन राजेंद्र यांच्या पत्नी पूर्वा यांनी केले आहे. कोपरगाव व दीर किशोर यांच्या मदतीने पुणे आदी ठिकाणी पूर्वा परिसरतील महिलांना सोबत घेऊन लिंबू लोणचे तयार करून विकतात. ज्यातून लिंबूचे योग्य मूल्यवर्धन होत असून शेतीला आपला हातभार लागत असल्याच्या पूर्वा आवर्जून सांगतात. 

बंधूचा सल्ला लाख मोलाचा 

अलीकडे अनेक शेतकरी परिवारांत कुटुंब विभाजन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र राजेंद्र व किशोर हे वयाच्या पन्नाशी नंतर ही गुण्यागोविंदाने एकमेकांच्या सल्लाने आहे. कृषी पधवीधर असल्याने शेती करतांना बंधू किशोर यांची नेहमी मदत होत असल्याचे राजेंद्र हे आवर्जून सांगतात हे विशेष. तसेच राजेंद्र यांचे माळीनगर येथील बंधु दिनेश गिरमे हे देखील ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. एकरी ९२ टन पर्यंत ते ऊसाचे उत्पादन घेतात. त्यांचाही सल्ला राजेंद्र घेत असल्याचे सांगतात. 

हे ही वाचा .. पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप 

टॅग्स :फळेआंबाआंबाशेतीशेतकरीकोपरगावअहमदनगर