Join us

Rain : आर्द्राच्या पावसाने शेतकरी राजा झाला समाधानी; १५ दिवसानंतर प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:08 IST

मृग नक्षत्रामध्ये पूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र पाऊस झाला नसल्याने बियाणांची उगवण अपेक्षित झाली नाही.

मुदखेड : जून महिन्यामध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस झाला. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. त्यानंतर १५ दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला होता, मृग नक्षत्र कोरडेच गेले होते, मात्र आर्द्रा नक्षत्र बरसल्याने शेतकरी समाधानी झाला असून सर्वदूर खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत.

मृग नक्षत्रामध्ये पूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र पाऊस झाला नसल्याने बियाणांची उगवण अपेक्षित झाली नाही. काही बियाणे वर आले मात्र पाऊस नसल्याने कोमेजून जात होते. आर्द्रा नक्षत्रात २५ जून रोजी मुदखेड तालुक्यात चांगल्या प्रकारे समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपांच्या पेरण्या झाल्या. बियाणांची चांगल्या प्रकारे उगवण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद झाला.

रात्रभर रिमझिम पाऊस चालूच होता. त्यामुळे खरिपांच्या पेरण्या समाधानकारक झाल्या. मुदखेड तालुक्यातील जवळपास ६० ते ७० टक्के पेरण्या उरकल्या आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी अशा सर्व वाणांची पेरणी करण्यात आली.

मुदखेड तालुक्यातील माळकौठा मंडळः १२०.६०, मुगट मंडळः १५७.२०, बारड मंडळ: १०३.१० पाऊस झाला तर तालुक्यात एकूण सरासरीच्या १५.३४ टक्के पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरण्या करताना पाच इंचापर्यंत जमिनीत ओल असावी, बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉ. अमर ज्योती गच्चे यांनी केले आहे.

रिमझिम पावसामुळे कोवळ्या पिकांना जीवदानगोकुंदा : किनवट तालुक्यातील गोकुंदा परिसरातील पावसाने दहा दिवस दडी भारल्यामुळे पेरणी झालेले व अंकुरात आलेले सोयाबीन, कापूस, तूर पीक कोमेजून जाऊ लागले. तर काही ठिकाणी पिकाने माना टाकल्या होत्या. परंतु २५ जून रोजी सायंकाळी रात्रभर झालेल्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान दिले. यामुळे गोकंदा परिसरातील शेतकरी सुखावले आहेत.

गोकुंदा परिसरात जूनच्या २० तारखेपर्यंत तालुक्यातील संपूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या. परंतु, पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झालेले व अंकुरात आलेले सोयाबीन कापूस, तूर, पीक, हळद पिके कोमेजून जाऊ लागले. तर काही ठिकाणी पिकाने माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट येणार असल्याचे चिन्ह दिसून येऊ लागले होते.

बुधवारी रात्रभर रिमझिम पावसाने पिकांना जीवदान दिले. पुन्हा एकदा नदी नाले काठोकाठ भरून वाहू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडोसा दिलासा मिळाला आहे. २६ जून रोजी दिवसभर पावसाने रिपरिप सुरू केल्यामुळे पिके पुन्हा एकदा बहरून आले.

मिमी पावसाची नोंद निवघा बा. मंडळात निवघा बाजार : हदगाव तालुक्यातील निवघा (बा.) महसूल मंडळात यंदाच्या पावसाळ्यातील सुरुवातीलाचा मोठा पाऊस झाला. बुधवारी रात्री पाऊस सुरू झाला. तो गुरुवारी दुपारपर्यंत संततधार सुरूच होता. निवघा (बा.) महसूल मंडळात ६८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी