गोंदिया : प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी शेती हे अत्यंत फायद्याचे क्षेत्र ठरत आहे. नियमित नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती साथ देते. पारंपरिक पीक पद्धतीला शेती साथ देईल असे होत नाही. हीच प्रयोगशीलता तालुक्यातील किडंगीपार येथील मधुलिका पटले (Madhulika Patale) या महिला शेतकऱ्याने जोपासली व भाजीपाला शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळविले.
भाजीपाला शेतीचा (Vegetable Farming) हा प्रयोग नगदी पिकाचा आहे. या प्रयोगातून आर्थिक सक्षम व आत्मनिर्भर झाले आहेत. किडंगीपार येथील मधुलिका पटले शेतकरी आहे. त्यांनी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून रोहयो अंतर्गत फळबाग (Amba Lagvad) लागवड योजनेमध्ये १ एकरवर आंबा लागवडीचा लाभ १० ते १५ वर्षापूर्वी मिळालेला आहे. त्यामध्ये आम्रपाली व रत्ना या वाणाची लागवड केली आहे. फळबाग लागवडीपासून दरवर्षी खर्च वजा जाता १ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना २०२१-२२, २०२२-२३ अंतर्गत २.०० हेक्टरचा ठिबक सिंचनाचा लाभ त्यांना मिळालेला आहे. तसेच एकात्मिक फलोत्पादन योजना २०२२-२३ अंतर्गत २ हेक्टर क्षेत्रासाठी प्लॉस्टिक मल्चिंगचा सुद्धा लाभ मिळाला आहे. यापूर्वी शेतात भाजीपाला पिकास पारंपरिक पद्धतीने पाणी देत होत्या. त्यामुळे वेळेवर पाणी देता येत नव्हते. पाणी सुद्धा कमी पडत होते.
दरम्यान कृषी विभागाकडून जेव्हापासून ठिबक संचाचा लाभ घेतला, तेव्हापासून २५ ते ३० टक्के पाण्याची बचत होऊन पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच मल्चिंगसाठी सुद्धा अनुदान मिळाल्यामुळे भाजीपाला लागवड करताना तण नियंत्रणाच्या खर्चामध्ये बचत झाली. मल्चिंग व ठिबक संचामुळे चांगल्या प्रतीचा भाजीपाला घेता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
एका हंगामामध्ये २ लाख ५० हजार रुपये उत्पन्नशेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर केल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे. कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतामध्ये सध्या मल्चिंगवर टोमॅटो १ हेक्टर, शिमला मिरची १ हेक्टर व कारले अर्ध्या हेक्टरवर लागवड करीत आहे. या भाजीपाला पिकापासून उत्पादन खर्च वजा जाता एका हंगामामध्ये २ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. पटले यांनी भाजीपाला शेतीतून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.